बुलडाणा : यावर्षी जिल्हय़ात जवळपास अडीच लाख हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मॉन्सूनचा पाऊस वगळता पावसात सातत्य नसल्याने अनेक तालुक्यातील सोयाबीन मान टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला होत असल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. जिल्हय़ातील शेतकर्यांवर मागील काही वषार्ंपासून सातत्याने नैसर्गिक संकटाची मलिकाच सुरू आहे. यावर्षी सर्व संकटातून शेतकरी सुखरुप बचावेल, असे वाटत होते; मात्र सोयाबीन पिकांवर होणार्या नैसर्गिक आक्रमणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गत वर्षी सोयाबीनची पेरणी २६६९२९ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हय़ात सर्वात जास्त सोयाबीन यंदा चिखली तालुक्यात सुमारे ६४ हजार हेक्टरवर करण्यात आले. तर सर्वात कमी सोयाबीन जळगाव जामोद तालुक्यात ८ हजार ७२ हेक्टरवर पेरण्यात आले आहे; मात्र मागील काही दिवसांपासून सोयाबीन या पिकावर संकटाची मालिका सुरु असल्याने आता शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्न होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्हय़ात प्रारंभी सोयाबीन पिकावर हिलीओथीस नावाच्या अळीचा हल्ला झाला. हा प्रभाव कमी होतो न होतो, तोच चक्रीभुंगाही आला व आता पाठोपाठ लष्करी अळीही दाखल झाली आहे. दुसरीकडे या पिकांना आवश्यक असलेला पाऊस गायब झाल्याने पिकाने माना टाकावयास सुरुवात केली आहे. *तालुकास्तरावर दिल्या विविध सूचना जिल्हय़ात सागाच्या झाडावर हल्ला चढविणार्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता सोयाबीनवरदेखील जाणवावयास लागला आहे. याची माहिती मिळताच जिल्हा कृषी अधीक्षक विभागाच्यावतीने सर्व तालुकास्तरीय कार्यालयात पत्र पाठवून या संकटाचा वेळेपूर्वीच बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.