बुलडाणा : ऐनपेरणीच्या हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकर्यांसाठी हे अस्मानी संकट नवीन नाही; परंतु यात सुलतानी संकटांची भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले; मात्र शेतकर्यांनी या सर्व गोष्टीला सामोरे जात संकटाच्या काळातही आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोजून चार-पाच दिवसात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच दुष्काळाचे ग्रहण लागले होते. पावसाच्या आशेवर बहुतांश शेतकर्यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत; मात्र पुढे पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला. पाण्याअभावी उभी पिकेही वाळून गेली. या आस्मानी संकटाबरोबरच शेतकर्यांपुढे सुलतानी संकटेही उभी राहिली. यंदा विविध बँकांनी थकीत कर्जदार शेतकर्यांना ऐनपेरणीच्या काळात कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्यांपुढे आर्थिक संकट उभे राहणे, जिल्हा प्रशासनाने कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय वेळेवर घेतला असता, तर शेतकर्यांना आर्थिक आधार मिळाला असता. यामुळे जिल्ह्यात पेरण्या लांबल्या. ३0 जूनपयर्ंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पावसाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे बळीराज्याचे मनोधैर्य खचल्यामुळे गत चार महिन्यात जिल्ह्यातील ११ शेतकर्यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकाराला; मात्र या पाचवीला पुजलेल्या संकटावरही मात करून आजपर्यंंत ७ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे.
संकटातही सावरल्या पेरण्या!
By admin | Published: August 26, 2015 12:31 AM