परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आईच्या गर्भात सुरक्षित श्वास घेत कलेकलेने मोठा होत जाणारा अर्भक नवजात बाळ म्हणून विश्वात पदार्पण करताच असा मृत्यूच्या दाढेत जात असल्याने येथील आरोग्य यंत्रणेविषयी जनसामान्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नवजात बाळांचा मृत्यू होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मागील चार महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दोन हजार ६६२ महिला भरती झाल्या. त्यापैकी एक हजार ७७४ प्रसृती नार्मल तर ८८८ प्रसृती सिझर करण्यात आल्या. त्यापैकी १०९ नवजात बालकांचा विविध कारणांने मृत्यू झाला. बाळ अविकसित असणे, प्रसुती उशिरा होऊन बाळाला आॅक्सिजन न मिळणे ही कारणे या नवजात बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र केवळ चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बालके रुग्णालयातच दगावत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. आॅगस्ट व सप्टेंबर २०१७ मध्ये ६८ दिवसात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. याबाबतचे ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.१०८ उपजत बालकांचा मृत्यूचंद्रपुरात मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात सोई उपलब्ध नसल्यामुळे चार महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी १०८ उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हाभर परिस्थिती गंभीरनवजात बालकांच्या मृत्यूची ही आकडेवारी केवळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात अशीच स्थिती आहे. तिथेही अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रसुत मातांना, त्यांच्या नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वास्तविक गर्भवती महिला, प्रसुत मातांनी काय खावे, कसे रहावे, याबाबत आरोग्य यंत्रणेकडून गावागावात जावून जनजागृती करणे अपेक्षित आहे. याशिवाय अनेक शासकीय योजनांद्वारे त्यांना पोषक आहारही दिला जातो. मात्र शासनाच्या या योजनांची गावागावात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गोरगरीब व शेतमजूर महिला व त्यांच्या अपत्यांचा बळी जात आहे.
१०९ नवजात बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:28 AM
बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देचार महिन्यातील स्थिती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार