सावरगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये संगणक प्रणालीद्वारे शासकीय कामकाजाबाबत सन २०११ ते २०१६ पर्यंत संग्राम या खासगी कंपनीला ग्रामपंचायतीमधील संगणक प्रणालीच्या कामकाजाचे कंत्राट होते. या कंपनीने मिळणाऱ्या निधीत कोट्यवधीचा घोळ केल्याची बाब जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांनी जि.प. निदर्शनास आणून दिली आहे. या वेळी यापुढे निधी द्यायचा नाही, असा ठराव सभेत सर्वानुमते घेण्यात आला. मात्र घोळ केलेल्या रकमेचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्टला सर्वसाधारण सभा पार पडली. मुख्य कार्यपालन अधिकारी मित्ताली सेठी, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते. गोविंदपूर -तळोधीचे जि.प. सदस्य यांच्या दोन प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये संगणक प्रणालीद्वारे शासकीय कामकाजाबाबत २०११ ते २०१६ पर्यंत संग्राम या खासगी कंपनीला संगणक प्रणालीच्या कामकाजाचे कंत्राट दिले होते. संगणक ऑपरेटरला कामगार कायद्यानुसार मिनिमम वेजीस (कमीत कमी मजुरी) नुसार सात हजार रुपये देणे अपेक्षित होते. २०११ ते २०१६ पर्यंत तीन हजार रुपये प्रतिमहा मानधन देण्यात आले. २०१७ पासून सहा हजार रुपये, जानेवारी २०२१ पासून प्रतिमहा सात हजार रुपये देण्यात येत आहेत. तेही वेळेवर अदा होत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १ लाख ४७ हजार ९७२ रुपये संग्राम कंपनीला दरवर्षी अग्रीम धनराशी दिली आहे. त्यात ऑपरेटर मानधन, स्टेशनरी, रिम, टोनर आणि संगणकाची देखभाल दुरुस्ती हा खर्च असतो. तोही वेळेवर होत नाही. तो ग्रामपंचायतींनाच करावा लागतो.
असा झाला आहे घोळ
सन २०११ ते २०१६ पर्यंत संगणक ऑपरेटरचा चार हजार रुपयांचा घोळ आणि जानेवारी २०१७ ते २०२१ पर्यंत प्रतिमहा एक हजार रुपयांचा घोळ अशा कोट्यवधीच्या घोळाकडे जि.प. मरस्कोल्हे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. परंतु याबाबत कोणतेच लेखापरीक्षण झालेले नाही.