चंद्रपूर : वेकोलिने नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे राजुरा तालक्यातील गोवरी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात तसेच शेतात शिरले. परिणामी अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत द्यावी तसेच भविष्यात पूर येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांच्यासह शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे केली आहे.
वेकोलिचे बल्लारपूर एरिया अंतर्गत पोवनी ओपनकास्टचे उत्खनन करणे सोयीचे व्हावे यासाठी वेकोलि प्रशासनाने परिसरातील ३ ते ४ नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदल गोवरी गावाजवळील नाल्यात सोडले. त्यातच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे या नाल्याच्या प्रवाहास अवरोध निर्माण होऊन बॅकवाॅटर गावात शिरत आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याबाबत निर्देश देऊन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे करण्यात आली. शिष्टमंडळ महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.