चंद्रपूर : गेल्या काही दिवसांत पावसामुळे रस्त्यांची पोलखोल झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आहेत. परिणामी, गंभीर व किरकोळ अपघात होत आहेत. यामधे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील चार-पाच वर्षांपासून प्रशासनाला जाग येण्यासाठी वारंवार मनसेकडून अभिनव आंदोलन करीत रस्त्यांची दुरुस्ती करण्यास भाग पाडले; परंतु दरवर्षीच जैसे-थे स्थिती दिसून येते. त्यामुळे मनसेने मंगळवारी कार्यकारी अभियंता कार्यालयात अनोखे आंदोलन केले. यावेळी अभियंत्यांना उत्कृष्ट खड्डेसम्राट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बुधवारी सकाळी जुनी पडोली रोडवरील विचोडाजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. मागील आठवड्यात बाबूपेठ येथे खड्ड्यांमुळे ऑटोमधील सहा लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे आक्रमक होत वारंवार तक्रार करूनही लक्ष न दिल्याने याला जबाबदार कार्यकारी अभियंता असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त झालेले कार्यकारी अभियंताचे कार्यालय गाठून त्यांना मनसेतर्फे उत्कृष्ट खड्डेसम्राट अभियंता पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देत निषेध नोंदविला, तसेच त्यांचे शुभेच्छा देणारे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोरील बॅनर फाडत आक्रोश व्यक्त केला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधि व जनहित जिल्हाध्यक्षा मंजूताई लेडांगे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विधानसभा संघटक मनोज तांबेकर, ग्रा. पं. सदस्य विवेक धोटे, नितीन टेकाम, असलम शेख, विनोद रेब्बावार, मयूर मदणकर, करण नायर, सुयोग धनवलकर, चैतन्य सदाफळ, तुषार येरमे, बाळू शेवते, वर्षा भोमले, अनुप माथणकर, अविनाश रोडे, संतोष नागरकर आदी उपस्थित होते.