चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेती करतात. परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल पिकविण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागते. अनेकदा अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जावे लागते. या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी इरई नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी साठा उपसा करून सिंचनाखाली आणणे शक्य आहे. त्यामुळे या परिसरातील कोरडवाहू क्षेत्राकरिता लघू सिंचन योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्याकडे केली आहे.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा भागातील अनेक शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती आहे. या भागात आदिवासी लाभधारक शेतकरी ५० टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांकरिता ही योजना वरदान ठरणार आहे. मंत्री महोदयांनी तत्काळ संबंधित सचिवाला आदेश देऊन ही योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या योजनेमुळे येथील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.