व्यंकटेश वैष्णव, बीड गावकीच्या राजकारणात विरोधकांना टक्कर देत निवडून आलेल्या जिल्ह्यातील ५११ ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च व जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने या सर्वांना नोटीस धाडून खर्च व प्रमाणपत्र तत्काळ सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर - नोव्हेंबर २०१५ मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या. याशिवाय पोटनिवडणुकांसाठीही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीतील खर्चाचा हिशेब महिनाभरात सादर करणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल २४८ सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये निवडून गेल्यानंतर हिशेब सादर केला नाही. जात वैधता प्रमाणपत्राआधारे निवडणुका लढवून ग्रामपंचायत निवडून गेलेल्या सदस्यांची स्थितीही याहून वेगळी नाही. सुमारे २६३ सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे एकूण ५११ सदस्यांच्या सदस्यत्वावरच कारवाईची टाच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खर्च सादर न करणारे सदस्य बीड - १४०, गेवराई - ७६, वडवणी - ३२ जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे सदस्य बीड - ७२, गेवराई - ६५, वडवणी - ९, शिरूर कासार - ५२, केज - ६५ प्रशासनाकडूनही दिरंगाई ग्रामपंचायत निवडणूक विभागाने निवडणूक हिशेब व जात वैधता प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या सदस्यांना वेळीच नोटीस देणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल चार महिन्यानंतर निवडणूक विभागाने सदस्यांना नोटीस पाठविली. काही सदस्यांनी नोटीस मिळताच खर्च व प्रमाणपत्र सादर करण्याची घाई केल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक खर्च व जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सदस्यांना १० एप्रिल २०१६ ची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत हिशेब व प्रमाणपत्र सादर न करणाऱ्याचे सदस्यत्वही धोक्यात येण्याची शक्यता आहे. ४त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत सदस्य हिशेब व प्रमाणपत्राच्या जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.
५११ ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस
By admin | Published: March 20, 2016 12:28 AM