औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला सुरुवात झाली. २ जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील ९९.८७ टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले. जिल्ह्यातील ९७ विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण असून, ६०१ विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले. मात्र, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नाही. तसेच ६२ हजार ७४१ विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
विभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत २५६० शाळांंतून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी १ लाख ७६ हजार १९३ नियमित विद्यार्थ्यांनी, तर ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून देण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ६२ हजार ७३१ नियमित, तर २२८० पुनर्परीक्षार्थी असे एकूण ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ६२ हजार ७४१ विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती करण्यात आली. ९७ विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण असून, ६०१ विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले, मात्र, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ज्यांचे निकाल अपूर्ण व निश्चित केले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ मिळते, की त्यांचे पुढे काय होणार, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. तसेच निकालाचे अभिलेखे जमा करण्याचे काम ६ जुलैपर्यंत केले जाणार आहे.
--
मुदतवाढीच्या सूचना नाहीत
विभागातील ९९ टक्केपेक्षा अधिक निकाल ऑनलाईन भरून झाले आहेत. फार थोड्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन येणे बाकी आहे. दहावी निकालाची ऑनलाईन निश्चिती व अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी मुदतवाढीबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे विभागीय सचिव सुगता पुन्ने म्हणाल्या.