..लातूर : अनुसूचित जाती तसेच नवबौद्धांच्या वस्ती विकासाचा ५५.६२ कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, कृती आराखड्यातील वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील २६२६ वस्त्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या बृहत् आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार २१५-१६ या वर्षात या वस्त्यांच्या विकासासाठी ५५.६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वस्ती निवड करण्याबाबत समिती गठित करण्यात आली होती. परंतु, ही समिती मे २०१५ अन्वये रद्द करण्यात आली असून, दलित वस्तीची कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृती आराखड्यातील दलित वस्त्यांची निवड करून त्यास प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तालुकानिहाय वस्त्यांची निवड करून शासनाकडून प्राप्त निधीच्या अधीन राहून या वस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. बृहत् आराखड्यानुसार जिल्ह्यात अशा २६२६ वस्त्या आहेत. त्यात लातूर तालुक्यात ४१७, अहमदपूर तालुक्यात २७७, उदगीर तालुक्यात ३३५, निलंगा तालुक्यात ४३८, औसा तालुक्यात ३६२, चाकूर तालुक्यात २३५, रेणापूर तालुक्यात १२५, देवणी तालुक्यात ११६, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १२७, जळकोट तालुक्यात १३४ वस्त्यांचा समावेश आहे. या वस्त्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्याबाबतच्या कृती आराखड्यावर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या वस्त्यांमध्ये आता सिमेंट रस्ते, लाईट, पाण्याची सोय, समाज मंदिर आदी कामे केली जाणार आहेत. दरम्यान, सभागृहात या कृती आराखड्यास मंजुरी देण्याचा ठराव रामचंद्र तिरुके यांनी मांडला होता. या ठरावाला भरत गोरे यांनी अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध व दलित समाजातील वस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेचाच हा भाग असून, शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहून या वस्त्यांमध्ये विकासाची विविध कामे होणार असल्याची माहिती जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी दिली. अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्धांच्या वस्त्यांसाठी ५५.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील काही निधी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीतून निवडलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, समाज मंदिरांची दुरुस्ती तसेच विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत.४वर्षभरात २२२६ वस्त्यांमध्ये ही कामे करून दलित वस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही कामे पूर्ण होणार आहेत, असे समिती सदस्य सहदेव मस्के यांनी सांगितले.
वस्ती सुधार योजनेसाठी ५५.६२ कोटींचा कृती आराखडा मंजूर
By admin | Published: November 14, 2015 12:30 AM