उस्मानाबाद : अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन जगता यावे, या उद्देशाने शासनाने अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली. परंतु, ही योजना सुरू झाल्यापासून एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात धूळखात पडून आहेत.अपंग व अव्यंग विवाहितांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाने सन २०१४ मध्ये संबंधित योजना सुरू केली. त्यानुसार अंमलबजावणीचे आदेशही दिले. समाजकल्याण विभागाकडून या योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवातदेखील केली. त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे २१ प्रस्ताव दाखल झाले होते. यांना अर्थसहाय्य देण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी केली होती. परंतु, निधी मिळाला नाही. पहिल्याच वर्षातील प्रस्ताव निधीअभावी धूळखात पडून असल्याने २०१५-१६ या वर्षामध्ये प्रस्तावांची संख्या घटली आहे. आजअखेर केवळ १० प्रस्ताव दाखल झाले आहेत. हे सर्व प्रस्ताव प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. समाजकल्याण विभागाकडून याबाबत पाठपुरवा करण्यात आला असला तरी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून छदामही उपलब्ध झाला नसल्याने ही योजनाच अडचणीत सापडली आहे. (प्रतिनिधी)
निधीअभावी योजना बनली विकलांग !
By admin | Published: November 19, 2015 12:15 AM