जालना : जिल्ह्यातील अपंगांच्या विविध समस्यांकडे जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांनी केला. जिल्ह्यातील अपंगांच्या मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदौरे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष हनुमान माने, शहराध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अपंगांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मोर्चेकरी अपंग असल्याने मोर्चा ऐवजी ४८८ शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अपंगांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आ.कडू यांनी आपल्या भाषणातून अपंगांच्या विविध योजना तसेच त्याची अंमलबावणी कशी होत नाही, यावर प्रहार केला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांसाठीचा ३ टक्के निधी खर्च करावा, अपंगांच्या बीज भांडवल योजनेचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, अपंगांच्या पुनर्वसन समित्या स्थापन करून त्यावर अपंग प्रतिनिधी नेमण्याची मागणी यावेळी कडू यांनी केली. अपंगांच्या योजना अंमलबजाणीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत अपंगांच्या विविध मुद्यांवर त्यांनी मत मांडले. तत्पूर्वी हनुमान माने यांनीही मनोगत व्यक्त केले. अपंगांच्या प्रमाण पत्रावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांना आ. कडू यांनी धारेवर धरत, त्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिने व दोन वर्षांच्या ताराखा दिल्या जात आहेत. हे चुकीचे असल्याचे सांगून या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी काही तांत्रिक निकष असल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी दुपारी झालेल्या पत्रपरिषदेत आ. बच्चू कडू यांनी १९९५ च्या कायद्यानुसार अपंगांना सोयी सवलती द्याव्यात, मात्र तसे होत नाही. त्याकरिता ४ एप्रिल रोजी दिल्ली येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. अपंग वित्त महामंडळावर सक्षम व्यक्ती असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अपंगांचे प्रश्न दुर्लक्षित...!
By admin | Published: March 20, 2016 12:32 AM