उमरगा : घरजागेची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी चिंचोली काटी (ता़लोहारा) येथील सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर याना उमरगा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच दहा हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ ही कारवाई २५ मार्च २०१४ रोजी करण्यात आली होती़ मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील काटे चिंचोली येथील राजेंद्र पांडुरंग कोळी हे कुसळंब (ता़पाटोदा) येथील खंडेश्वर विद्यालयात सेवक म्हणून कामकाज करतात़ त्यांनी ७ नोव्हेंबर २०१३ रोजी काटे चिंचोली येथील विमलबाई बाबुराव कडदोरे यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या मिळकत क्रमांक ५५ मधील १६६४ चौ़ फूटाची जागा ९९ वर्षाच्या करारावर घेतली होती़ या करारपत्रानुसार ग्रामपंचायत काटे चिंचोली येथे आठ-अच्या रेकॉर्डमध्ये नाव लावण्यासाठी कोळी यांनी सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर यांच्याकडे करारपत्राची छायांकित प्रत व इतर कागदपत्रे ८ नोव्हेंबर २०१३ रोजी दिले होते़ आठ-दहा वेळेस चकरा मारून सरपंच जेटीथोर यांची भेट घेवून कागदपत्रानुसार ग्रामपंचायतच्या आठ-अची नोंद मंजूर करून त्याची प्रत देण्याची विनंती केली होती़ परंतू सरपंचांनी टाळाटाळ करून आठ-अला नोंद केली नाही़ कोळी यांनी २६ नोव्हेंबर २०१३ व १५ जानेवारी २०१४ रोजी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावे अर्ज करून आठ-अ ला नोंद करण्याची मागणी केली होती़ त्यानंतर २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सरपंच जेटीथोर यांनी कोळी हे कुसळंब येथे असताना फोन करून २५ मार्च रोजी १० हजार रूपये आणून द्या मी तुमची आठ -अ ची नोंद मंजूर करून त्याची प्रत तुम्हाला देण्याचे काम करतो, असे सांगितले़ लाचेची मागणी होताच कोळी यांनी उस्मानाबाद येथे एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दाखल केली़ तक्रार दाखल होताच पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी २५ मार्च २०१३ रोजी माकणी येथील ज्यू जयभवानी हॉटेलमध्ये सापळा रचला़ त्यावेळी सरपंच हरिश्चंद्र जेटीथोर यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताच कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास करून उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी उमरगा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़ए़पोतदार यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर यांना विशेष न्यायाधीश एम़एस़मुंगळे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक कलम ७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड व कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपे दंड व दंड न दिल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याचे अॅड़ एस़ए़पोतदार यांनी सांगितले़
लाचप्रकरणी चिंचोलीच्या सरपंचांना सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Published: March 20, 2016 12:36 AM