औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात. अनेक ठिकाणी तर सरपंच आणि गावपुढारी हे ग्रामसभेत झालेले ठराव बदलून नंतर मर्जीप्रमाणे निर्णय घेतात. मग, अशा ग्रामसभांचा उपयोग काय, असा सूर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत उमटला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शनिवारी ‘जागतिकीकरणाच्या युगात ग्रामसभेची आवश्यकता?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेतली. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील दोन, अशा एकूण २२ सरपंच आणि ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला सरपंच वर्षा जाधव यांनीदेखील अंतर्मुख करणारे मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत वैजापूर तालुक्याला प्रथम पारितोषिक मिळाले. वादविवाद स्पर्धेनंतर आयोजित कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘ग्रामपंचायतींची आयएसओ’कडे वाटचाल’, नवीन करप्रणाली लागू करण्याचा फॉर्म्युला’ आणि ‘चौदावा वित्त आयोग’ यासंदर्भात प्रेझेंटेशनद्वारे माहिती सादर केली.