सैनिक फेडरेशनतर्फे महाराष्ट्रभर जनसंपर्क तथा सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष सावंत यांचा दौरा सुरू आहे. औरंगाबादेतील सैनिकांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. सैनिकांवर होणारे हल्ले किंवा त्यांच्या प्रश्नांचे निराकरण पोलीस ठाण्यात होत नसल्याने तालुका पातळीवर सैनिकांची दक्षता समिती स्थापन करण्यात यावी, यासाठी फेडरेशनचे प्रयत्न सुरू आहे.
विविध सेक्टरमध्ये माजी सैनिकांना नोकरभरतीसाठी तीन ते चार वर्षांचा विलंब लागतो, माजी सैनिकांना पोलीस, वैद्यकीय तसेच मनपा, महसूल सेवा आणि शाळेतदेखील शिक्षक म्हणून भरती करावी, इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या.
अन्यथा राजकीय नेत्यांना श्रद्धांजलीला येऊ देणार नाही...
सैनिकांचे प्रश्न हेतुपुरस्सर लांबविले जातात. सैनिक शहीद झाला की, त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहण्यासाठी नेते येतात. खोटी आश्वासने देऊन जातात. शहिदाच्या कुटुंबीयांचे प्रश्न प्रलंबित ठेवले जातात. सैनिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा शहीद सैनिकांच्या पार्थिवावर एकाही राजकीय नेत्यांना येऊ देणार नाही, असा इशारा फेडरेशनच्या वतीने देण्यात आला.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष दीपकराजे शिर्के, शेख रफीक, डी. एम. निंबाळकर, अनिल सातव, बाबासाहेब जाधव, गजानन पिंपळे आदींची उपस्थिती होती.