औंढा नागनाथ : माहेराहून २० हजार रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने तिच्या पतीस एक महिना सक्तमजुरी व २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल औंढा नागनाथ येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिला आहे.सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे नंदा (वय २२) हिचे लग्न २००५ मध्ये रुपूरतांडा येथील विजय भागोराव चव्हाण याच्याशी झाले. लग्नानंतर सदरील विवाहितेला एक वर्ष चांगले वागविण्यात आले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी माहेराहून २० हजार रुपये घेवून ये म्हणून तिचा छळ करण्यास सुरूवात केली. तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळीची मागणी पूर्ण न केल्यामुळे विवाहितेला मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेत तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याबाबत नंदा विजय चव्हाण हिने औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विजय भागोराव चव्हाण (पती), भागोराव चव्हाण (सासरा), यशोदाबाई भागोराव चव्हाण (सासू), रेखा भागोराव चव्हाण (नणंद, सर्व रा. रुपूर तांडा) यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन तपासीक अंमलदार पोहेकॉ आर.एन. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकुण तीन साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश प्रथमवर्ग ए. बी. शेंडगे यांनी ५ जून रोजी खटल्याचा निकाल देताना, आरोपी विजय भागोराव चव्हाण यास कलम ४९८ अ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून एक महिना सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी सुनावण्यात आली. दंडाच्या रकमेपैकी १ हजार रुपये नंदा चव्हाण हिला नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. महेश आहेर यांनी काम पाहिले. तक्रारदार महिलेच्या वतीने अॅड. चंद्रकांत झुंगरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)तिघांची निर्दोष मुक्तताहिंगोली जिल्ह्यातील रुपूरतांडा येथे माहेराहून २० हजार रूपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केला होता विवाहितेचा छळशारीरिक व मानसिक त्रास देवून पैशासाठी विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला घराबाहेर हाकलले. याप्रकरणी सदर विवाहितेने पोलिसांत दिली होती तक्रारविवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयाने पतीस दोषी ठरवून एक महिना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.या खटल्यातील तीन आरोपींची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने सुटका केली आहे.दंडाच्या रकमेपैकी १ हजार रूपये तक्रारदार महिलेस नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.प्रथमवर्ग न्यायदंडाशिकारी ए.बी. शेंडगे यांनी दिला निकाल.
विवाहितेचा छळ; पतीस सक्तमजुरी
By admin | Published: June 06, 2014 11:23 PM