बीड : ज्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामांची साडेअकरा लाख रुपयांची बिले अदा केली त्यांनीच आता रस्ते सापडत नसल्याचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. माजलगाव तालुक्यातील तालखेडमध्ये वित्त आयोगाच्या निधीची अधिकाऱ्यांनी वासलात लावल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे.तेराव्या वित्त आयोगातून तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत चार रस्त्यांची कामे झाल्याचे दाखविण्यात आले. उपसरपंच मोहन जाधव यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी ए. के. पांढरे यांनी शाखा अभियंता व्ही. व्ही. चाटे व जि.प. च्या उपविभागातील उपअभियंत्यांना सोबत घेऊन २९ आॅक्टोबर २०१५ रोजी पंचनामा केला. यात ज्या रस्त्यांच्या कामांची देयके जुलै- आॅगस्ट २०१५ मध्ये अदा केली ती कामेच झालेली नसल्याचे समोर आले. गटविकास अधिकारी पांढरे यांच्यासह उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीनेच देयक अदा झाले होते हे विशेष! रस्ते आढळून आली नाहीत, असा अहवालही पांढरे यांनी सीइओ ननावरे यांना १६ नोव्हेंबर २०१५ रोजी पाठविला आहे.त्यामुळे जे रस्तेच अस्तित्वात नाहीत त्या रस्त्यांची बिले पांढरे यांनी कुठल्या आधारावर अदा केली? असा सवाल उपसरपंच मोहन जाधव यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
बिले देणाऱ्यांनाच सापडेनात रस्ते
By admin | Published: November 25, 2015 11:00 PM