राजेश भिसे , जालना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा परिणाम जालन्यातील औद्योगिक वसाहतीलाही सहन करावा लागत असून, जास्तीच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता. शुक्रवारी विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्टिल उद्योग जगतातील वीज दरात सूट देण्याची मागणी मान्य झाल्याने महिन्याला दहा कोटी रुपये वाचणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. परिणामी स्टिलचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. गत काही वर्षांत स्टिल उद्योगाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरारी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राद्वारे सळईची निर्मिती केली जात आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत औद्योगिक वसाहतीत ५० छोट्या मोठ्या कंपन्या सुरू होत्या. मंदीचे वातावरण आणि अधिकच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता. सद्यस्थितीत १४ मोठे प्रकल्प सुरू आहेत. तर उर्वरित छोट्या मोठ्या कंपन्यांची अवस्था बिकट आहे. काही महिन्यांपूर्वी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वीजदरात सूट देण्याची मागणी केली होती. तसेच जानेवारीत मुख्यमंत्री जालन्यात आले होते. तेव्हा त्यांनी उद्योजकांची परिषद घेतली होती. त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. आगामी अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी या परिषदेत दिले होते. त्यानुसार आगामी अर्थसंकल्पात या उद्योजकांची मागणी पूर्ण करण्यात आली. याद्वारे स्टिल उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वीजदरात १ रुपयाची सूट देण्यात आल्यास महिन्याला या उद्योग जगताचे १० कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे स्टिल उद्योगाला उभारी मिळणार असून, स्टिलचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंदीची काजळी दूर होणार असून, रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे. एकूणच मंदीच्या गर्तेत अडकलेल्या या स्टिल उद्योगाला उभारी देण्याचे काम या अर्थसंकल्पातून झाले आहे.
जालन्यातील स्टील उद्योगाला उभारी येणार...!
By admin | Published: March 20, 2016 12:32 AM