अंबड : शहरास मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, याच भुमिकेतून आज आपण ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन केल्याचे प्रतिपादन आ.राजेश टोपे यांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी केले. आ. टोपे यांनी शहरातील सर्व खराब रस्त्यांचे नुतनीकरण येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.अंबड हे उत्तम दर्जाचे शैक्षणिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयास यावे यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर सतत प्रयत्नशील आहोत. याच भुमिकेतून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक योजना शहरात राबविण्यात आलेल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अद्यापही सुरुच असुन भुयारी गटार योजनेच्या कामामुळे मागील अनेक महिन्यांपासुन रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले असुन उर्वरित रस्त्यांच्या कामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. काही तांत्रिक बाबींची पुर्तता करुन येत्या पंधरा दिवसांत शहरातील उर्वरित रस्त्यांचे भूमिपुजन होणार आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास त्याची तक्रार व निपटारा तत्काळ करणे गरजेचे आहे. नगरपालिकेने शहरातील सर्व ओपन प्लेस तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना कुंपन घालण्याच्या तसेच त्यांना विकसीत करण्याच्या सुचना आपण नगरपालिकेल्या दिल्या आहेत. जायकवाडी पाणीपुरवठा होत असल्याने शहराचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असुन शहरातंर्गत वितरण व्यवस्था बदलण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सध्या तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत असून लवकरच दररोज करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आ.टोपे म्हणाले. कार्यक्रमास नगराध्यक्षा मंगलताई कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, काकासाहेब कटारे, बाजार समिती सभापती सतिश होंडे, प्राचार्य डॉ भागवत कटारे उपस्थित होते.
अंबडला मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर करण्यासाठी प्रयत्नशील- टोपे
By admin | Published: November 29, 2015 11:01 PM