वैजापूर : तालुक्यातील नांदूर ढोक शिवारात सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपणासाठी आणलेली शेकडो रोपे पडीक जमिनीत महिनाभरापासून बेवारस पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. अर्थात वृक्षारोपण लागवडीचा फज्जा उडाला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते. त्यासाठी रोपे तयार करणे, वाहतूक करणे, लागवड करणे, कुंपण करणे, पाणी देणे. तसेच रोपे खरेदी करणे यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, ही लागवड केवळ कागदोपत्री दाखविण्यात येते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
नांदूर ढोक शिवारात अनेक रोपे बेवारस स्थितीत टाकून देण्यात आली आहेत. तसेच काही रोपे लागवड केल्याचे दाखवून ठिकठिकाणी जमिनीवर टाकून देण्यात आली आहेत. सदर झाडांचे रोपण न करता ती टाकून दिल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कागदोपत्री लागवड दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आल्याची शंका निर्माण झाली आहे.
-----
अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळेना
शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागासारख्या महत्त्वाच्या विभागाकडून अशाप्रकारे दुर्लक्ष करीत शासनाचा निधी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचविण्याचा प्रकार नांदूर ढोक शिवारात समोर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयात भेट दिली. मात्र, तेथील अधिकारी मिळून आले नाहीत. त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
----
फोटो
030721\img-20210703-wa0164.jpg
गेल्या महिन्याभरापासून नांदुर ढोक येथे झाडांची रोपे बेवारस पडून आहेत