औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या कामासाठी मनपा ५५० एकर जागा ताब्यात घेणार आहे. या भागातील काही जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असून, आमच्या एनओसी शिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असे पत्र शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना पाठविले. त्यामुळे मनपाचे संकट तूर्त वाढले आहे.नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. या भागात ग्रीन फिल्ड विकासाला वाव असल्याने परिसराची निवड करण्यात आली आहे. मनपाने यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव अजून केंद्र शासनाला सादर केलेला नाही. नक्षत्रवाडी किंवा चिकलठाणा या दोन्हीपैकी एका ठिकाणची निवड करण्यात येणार असल्याचे मनपाने म्हटलेआहे. नागरिकांची मते जाणूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र पाठविले आहे.या पत्रात पटेल यांनी म्हटले आहे की, कांचनवाडी येथील वक्फ मालमत्ता मशीद, दर्गाह, कब्रस्तान, आशूरखाना आदींसाठी आहे. सर्व्हे नं. ७ मध्ये ६ एकर १४ गुंठे, नक्षत्रवाडी येथे गट क्र. ६५ मध्ये २४ एकर २ गुंठे जमीन आहे.शासनाच्या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा अधिग्रहित करायची असल्यास वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. एनओसी मिळाल्याशिवाय वक्फची मालमत्ता स्मार्टमध्ये गृहीत धरण्यात येऊ नये, असेही पत्रात म्हटले आहे.
स्मार्टच्या ग्रीन फिल्डवर वक्फचा आक्षेप
By admin | Published: November 28, 2015 12:43 AM