पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना १९ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ही महिला शेतातून भूईमुगाचे वेल उपटून घरी परत येत असताना ही घटना घडली. कोल्हावाडी या गावाला आंबेगाव फिडरमधून वीज पुरवठा होतो. या फिडरहून येणारी मुख्य वाहिनी पाणीपुरवठा योजनेच्या डीपीला जोडण्यात आली आहे. मुख्य वाहिनीचे दोन खांब डीपीला जोडण्यापूर्वीच बालासाहेब शंकरराव भिसे यांच्या शेतात काही महिन्यांपासून वाकले गेले होते. यामुळे मुख्य वाहिनीच्या तारा जमिनीलगत लोंबकळत होत्या. शेतकर्यांनी या संदर्भात वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांकडे अनेक वेळा तक्रारी करुन वाकलेले खांब दुरुस्त करुन देण्याची मागणी केली होती. परंतु, वीज कंपनीच्या अधिकार्यांनी याकडे कानाडोळा केला. १९ मे रोजी गावातील एका शेतकर्याच्या शेतात भूईमुगाच्या पिकाची काढणी सुरु होती. यावेळी जवळपास १०० महिला सकाळी ६ वाजताच भूईमूग शेंगा काढण्यासाठी शेतात गेल्या. वेल उपटून या महिला गावाकडे परत येत असताना बालासाहेब भिसे यांच्या शेतातील मुख्य वाहिनीच्या वाकलेल्या खांबाच्या तारेला आशामती केशव भिसे या महिलेच्या डोक्याचा स्पर्श झाला. तारेत विद्युत प्रवाह सुरु असल्याने महिला तारेला चिटकून पडली. आजुबाजुच्या महिलांच्या लक्षात हा प्रकार आला. परंतु, मुख्य वाहिनीची तार असल्याने या प्रसंगी या महिलेस कोणी मदत करु शकले नाही. काही महिलांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतरांनी आरडाओरड केल्यामुळे या महिलाही अपघातातून बालंबाल बचावल्या. काही क्षणातच तारेला चिटकलेल्या आशामती यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच आशामाती यांचा मृत्यू झाला होता. (वार्ताहर) अधिकार्यांवर कारवाई करा-वर्षा भिसे कोल्हावाडी येथील आशामती भिसे यांचा तारेला स्पर्श लागून मृत्यू झाला. या प्रकरणास वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. घटनेनंतर तब्बल सहा ते आठ तासापर्यंत कंपनीच्या अधिकारी किंवा कर्मचार्याने या ठिकाणी भेट दिली नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचार्यांना या वाकलेल्या खांबाबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याच लोंबकाळलेल्या तारामुळे आशामती भिसे यांचा दुदैवी मृत्यू झाला. वीज कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन अधिकारी व कर्मचार्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सरपंच वर्षाताई विठ्ठलराव भिसे यांनी केली आहे. गावाला जोडणार्या मुख्य वाहिनीच्या तारा लोंबकळत पडलेल्या घटनेला काही महिने झाले होते. गावचा लाईनमन, कंपनीचे शाखा अभियंता यांना अनेकवेळा ग्रामस्थांनी तोंडी कल्पना दिली होती. वीज कंपनीने मुख्य वाहिनीच्या तारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढावला गेला.
तारेला चिटकून महिलेचा मृत्यू
By admin | Published: May 19, 2014 11:57 PM