लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या लातूर जिल्ह्यात २०८६ कामे सुरू असून, या कामांवर २४ हजार ८९ मजूर काम करीत आहेत. दुष्काळामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामांवर चारपटीने मजूर वाढले आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २०८६ कामांपैकी १९७१ कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येत आहेत. तर ११५ कामे शासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहेत. २०१२ मधील मार्च महिन्यात ५७६ प्रतिदिनी मजूर कामावर होते. तर २०१३-१४ मध्ये ३९५० मजूर रोहयोच्या कामांवर होते. २०१४-१५ मध्ये ६ हजार ७७४ मजुरांची संख्या होती. तर यंदा २४ हजार मजूर कामावर आहेत. यंदा केवळ दुष्काळ असल्यामुळे ही संख्या चारपटीने वाढली आहे. रोजगार हमी योजनेत सद्य:स्थितीत १४१३ सिंचन विहिरींची कामे सुरू असून, लातूर तालुक्यात ११८ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. औसा तालुक्यात ३०४, रेणापूर तालुक्यात १३७, उदगीर तालुक्यात १७४, अहमदपूर तालुक्यात १५६, चाकूर १३०, देवणी १४१, जळकोट तालुक्यात ९१ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. तसेच रस्त्याची ६९ कामे सुरू असून, ९३ कामे जलसंधारणांची आहेत. सार्वजनिक विहिरी ९, वनीकरणाची ४१, शेततळे १६, शोषखड्डे ३३४ आणि १११ इतर कामे असे एकूण २०८६ कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)
यंदा चारपटीने मजूर वाढले
By admin | Published: March 31, 2016 12:19 AM