मुंबई : पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने ऑपरेशन यात्री सुरक्षाअंतर्गत स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने विविध गुन्ह्यांतील १२० गुन्हेगारांना अटक केली आहे. या दोन महिन्यांत ही कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीला माल जप्त केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज २५ ते २७ लाख प्रवासी प्रवास करतात.
प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी इनबिल्ट रिकिशन सिस्टम (एफआरएस) सोबत ४८८ कॅमेऱ्यांसह तीन हजार ८०२ सीसीटीव्ही लावले आहेत. रेल्वे स्थानक, परिसर आणि प्लटफार्मवर विविध गुन्हे घडतात. त्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही उपयोगी पडतात. जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ या दोन महिन्यांत विविध १२० गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांची चोरीचा मालही जप्त केला आहे.
दक्ष आरपीएफ जवानांनी प्रवाशांसंबंधित चोरी आणि दरोडा यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडले आहे आणि प्रवाशांकडून मोबाइल, रोख रक्कम असलेल्या बॅग, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे, पाकीट आदी जप्त करण्यात मदत केली आहे. या समाजकंटकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे