नवी दिल्ली - बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस (Police) घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपींनी आपले कपडे तिथेच सोडले आणि नग्नावस्थेतच ते पळत सुटले. आरोपींनी आपल्या चपलाही तिथेच सोडल्या. बिहारच्या गयामध्ये ही घटना घटना घडली आहे.
पीडित महिलेची अवस्था सध्या अत्यंत गंभीर आहे. महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फस्सिल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. दोन तरुण महिलेला उचलून आपल्या गाडीवरून फल्गु नदीवर घेऊन गेले. याचठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी 12 जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेने याचा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला जबर मारहाण केली.
सुरुवातीला जेव्हा तरुण महिलेला घेऊन नदीच्या काठावर आले तेव्हा आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना पाहिलं. मात्र, अंधार असल्याने कोणाला काहीच समजलं नाही. काही वेळानंतर जेव्हा बाईकवरून 12 जण नदीकडे जाताना दिसले तेव्हा गावातील लोकांना शंका आली. यानंतर गावातील काही लोकांनी नदीच्या कडेला जाऊन पाहिल्यानंतर त्यांना या घटनेबद्दल समजलं. यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातीला काहीच समजलं नाही.
पोलिसांची नजर नंतर बाईकवर गेली आणि यानंतर नदीत उड्या घेत पोलीस मध्यभागी असलेल्या बेटावर पोहोचले. पोलिसांना येताना पाहून आरोपी कपडे न घालताच नग्नावस्थेत पळत सुटले. पोलिसांनी आरोपींचे कपडे आणि चपला ताब्यात घेतल्या आहेत. तर, महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.