नितिन पंडीत
भिवंडी - एकतर्फी प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या मुलीच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातील कवाड येथे घडली असून या मधील हत्या करणाऱ्या आरोपीस भिवंडी तालुका पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे . कमलजीत वारीयम सांडे वय ५५ रा.उल्हासनगर नंबर पाच असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे . तर पप्पू कुमार राजकिशोर साह वय २६ रा.उल्हासनगर मूळ रा.चंपारण्य बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपा शेजारील मोकळ्या निर्जन जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह हत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला .त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करीत ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला असता तो उल्हासनगर येथील कमलजीत वारीयम सांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले .
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस डी दाभाडे व पोलीस पथकातील पो कर्मचारी काळोखे,वाडविंदे व गुन्हे पथकतील पोलीस यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून व गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बिहार येथे पळून गेल्याचे समजताच पोलीस पथकाने थेट बिहार गाठत तेथून आरोपी पप्पू कुमार राजकिशोर साह यास ताब्यात घेत अटक केली . त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्या करण्यसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त करीत त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती तपास अधिकारी दाभाडे यांनी दिली आहे .