गुरुग्राममधील सेक्टर-59 येथील बॅकयार्ड स्पोर्ट्स क्लबमध्ये सनबर्न फेस्टिव्हल सुरू होतं. नेदरलँडच्या एका कलाकाराची म्यूझिक कॉन्सर्ट होती. या कार्यक्रमाला जवळपास 10 हजार लोक जमले होते. यावेळी अचानक वीज गेली, त्यानंतर 72 जणांचे मोबाईल चोरीला गेले. याप्रकरणी पोलिसांनी मोबाईल हरवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डीसीपी दक्षिण सिद्धांत जैन यांनी सांगितलं की, पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, बॅकयार्ड स्पोर्ट्स क्लबमध्ये सनबर्न फेस्टिव्हल असल्याने अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि अनेकांचे फोन गायब झाल्याचं आढळलं.
ते म्हणाले, या प्रकरणी सेक्टर 65 पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा सात जणांची तक्रार आली होती, ज्यांनी फेस्टिवलमधून त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी याचा खुलासा करत 12 जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवासी हिमांशू विजय सिंह यांनी सांगितले की, या फेस्टिवलदरम्यान त्यांचे आणि त्यांची पत्नी अवंतिका पोद्दार यांचे मोबाईल चोरीला गेले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी लक्ष्य रावल, अर्जुन कचरू, सौम्या ज्योती हलदर, सार्थक शर्मा आणि करण चौहान यांचे चोरीला गेल्याचे सांगितले.
शौर्य गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, ती तिच्या तीन मित्रांसह कार्यक्रमात व्हीआयपी लेनमध्ये होती, तेव्हा रात्री 8.20 वाजता त्यांच्यापैकी एकाने तिचा मोबाइल गायब असल्याचं सांगितलं. अंधारामुळे त्याने स्वतःच्या फ्लॅश लाईटने मोबाईल शोधायला सुरुवात केली, पण तो सापडला नाही. अवघ्या 10 मिनिटांनंतर गुप्ता यांचाही फोन गायब झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.