नितिन पंडीत भिवंडी - मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगष्ट रोजी उघडकीस आली आहे . या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र पोलीस तपासात खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात मयत प्रभाकर याची पत्नी श्रुती प्रभाकर गंजी ( वर्ष ३२ रा. कणेरी ) व तिचा प्रियकर नितेश गोवर्धन वाला ( वय २८ वर्ष , रा.भादवड ) व मैत्रीण प्रिया सुहास निकम ( वय ३२ वर्ष , रा.वेताळपाडा ) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत. मयत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश वाला या सोबत विवाह करण्यासाठी आपल्या पती कडे घटस्फोटा साठी तगादा लावला होता मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली असता तिचा सुध्दा घटस्फोट झाला असल्याने तिने श्रुती हिला पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला असता त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले. त्यांनतर पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती प्रियकर नितेश मैत्रीण प्रिया यांनी कट रचून हत्या करणाऱ्यांनी ३१ ऑगष्ट च्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून रात्री दहा वाजता कार बुक केली , व त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून शव कार मध्येच ठेवून पसार झाले होते.
या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले आहे . या गुन्ह्यात पत्नी श्रुती, तिचा प्रियकर नितेश व मैत्रीण या तिघांना बुधवारी अटक केली असून या तिघांनाही न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . तर हत्या करणारे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .