- डी. बी. पाटील
यावल : तालुक्यातील दहिगाव येथे मुख्य चौकात लावलेल्या फलकाची विटंबना झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सकाळी ही घटना कळताच मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमला आणि तीन तास पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. फैजपूरचे उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पो. नि. राकेश माणगावकर हे ताफ्यासह दहीगावात पोहोचले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने फलकाचे शुद्धीकरण करण्यात आले. सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. सोनवणे यांनी दिली. गावात तणाव असल्याने यावल -दहिगाव-सावखेडा बससेवा सकाळपासून बंद होती. निळे निशाण संघटनेची संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, विष्णू पारधे यांनी शांततेचे आवाहन केले.