उस्मानाबाद : ब्रेक दि चेन अभियानांतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी काढण्यात आलेल्या नव्या आदेशात ई कॉमर्स सेवेबाबतचा अंतर्भाव झालेला नव्हता. शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी एका आदेशाद्वारे स्पष्टता आणत घरपोच सेवेला परवानगी असल्याचे म्हटले आहे.
जनता कर्फ्युचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सोमवारपासून नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील काही सेवा सुरु होत आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळुहळु कमी होत असल्याने जनता कर्फ्यु आणखी न लांबवता व्यापारी व नागरिकांना काहिशी सवलत देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी काढण्यात आलेल्या आदेशातून किराणा, दूध, भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या आदेशात ई कॉमर्स सेवेचा अंतर्भाव नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केवळ घरपोच सेवेला परवानगी असल्याचे म्हटले आहे. मात्र, या कंपन्यांना केवळ अत्यावश्यक सेवेतील वस्तूंचीच सेवा देण्यास मुभा आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वस्तू वितरीत करीत असल्यास तो नियमभंग ठरेल. व संबंधित सेवा देणार्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. तसेच वारंवार या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना हा साथरोग म्हणून जोपर्यंत अधिसूचित राहील, तोपर्यंत आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, असे स्वामी यांनी आपल्या आदेशातून कळविले आहे. घरपोच सेवा देणार्या व्यक्तीचे तातडीने लसीकरण करुन घेणे गरजेचे असून, सेवा देताना कोरोनाविषयक सर्व काळजी त्याने घेणे आवश्यक असल्याचेही आदेशात म्हटले आहे.