अपसिंगा-वरवंटी मार्ग : संथगती कामामुळे वाढला अपघाताचा धोका
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा ते वरवंटी पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. यामुळे प्रशासनाने या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराने महिनाभरापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा खडी दगड-गोटे आणून टाकले असून, काम मात्र संथगतीने सुरू असल्याने वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
मागील तीन-चार वर्षापासून आपसिंगा ते वरवंटी या सहा किमी रस्त्याच्या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन नेमके काेठून काढायचे, असा प्रश्न वाहनचालकांना खड्डे पाहून पडत आहे. विशेषत: दुचाकी चालकांना तर एक खड्डा चुकवेपर्यंत दुसरा खड्डा समोर येत असल्यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे आणि त्यातच रस्ता दुरुस्तीसाठी टाकलेली दगडी गिट्टी यामुळे एकीकडे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी गिट्टीवर जाऊन गाडी स्लिप होऊन चालक जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.
गेल्या महिनाभरापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी संबंधित ठेकेदाराकडून याला गती मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कामासाठी टाकलेली दगडी खडी रस्त्यावरील विखरुली जात असून, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कोट.........
आजारांना निमंत्रण
या रस्त्यातील खड्ड्यामुळे वाहन चालविताना चालकांना प्रचंड त्रास होत असून, त्यामुळे पाठदुखी, कंबर दुखी यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. शिवाय, रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेल्याने वाहनेही खिळखिळा होत असून, यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता दुरूस्ती बाबत मागणी केली होती. रस्ता खराब असल्यामुळे एसटी. बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यातच रस्ता पूर्णतः खराब असल्याने आपसिंगा, कात्री, कामठा येथील नागरिकांना जिल्ह्याला जायचं म्हटलं तर बेगडा-पोहनेरमार्गे जावे लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
- अमीर शेख,ग्रा. पं. सदस्य, आपसिंगा
मला दररोज आपसिंगा-कामठा-वरवंटी-गावसूद मार्गावरून उस्मानाबाद येथे कामानिमित्त जावे लागते. परंतु, रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने दुचाकीवरून जात असताना कंबर दुखीचा त्रास होत आहे. शिवाय, गाड्या स्लिप होऊन अपघातही घडत आहेत.
- गणेश कोरे, प्रवाशी