काक्रंबा : येथे एका भरधाव कारने चिकन सेंटरला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत एकजण ठार झाल असून, दोघे जबर जखमी झाले आहेत.
तुळजापूरहून लातूरकडे जात असलेल्या (एमएच २५ आर ८२७ा क्रमांकाच्या एका कारने काक्रंबा बसस्थानकावर दुसऱ्या एका कारला धडक देऊन पुढे ती बाजूच्याच चिकन सेंटरमध्ये घुसली. यामध्ये चिकन सेंटरचे मालक जिलानी अहमद मुलानी (५५) यांना जबर मार लागला. त्यांना पुढील उपचारासाठी तुळजापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. सोबतच चिकन घेण्यासाठी गेलेल्या दोन ग्राहकांनाही जबर दुखापत या घटनेत झाली आहे. दरम्यान, क्राक्रंबा येथील उड्डाणपुलाचे काम गेली दोन वर्षे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने नेहमीच येथे अपघात घडत आहेत. रत्नागिरी-तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तुळजापूर ते औसा ५५ कि.मी.चे पूर्ण झाले आहे. यावरील केवळ काक्रंबा येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत ठेवल्याने येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात घडून येत आहेत. याविषयी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने दिली. मात्र, कामाला गती येत नसल्याने आणखी किती बळी हा उड्डाणपूल घेणार, असा संतप्त सवाल, ग्रामस्थांमधून केला जात आहे.