वाशी-इंदापूर रस्त्यालगत असलेल्या शेतरस्त्यावर बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून, यामुळे उमेश खडके याचा सर्व्हे नंबर ७९ व ८० मधील चार दिवसांपूर्वी तोडलेला ऊस बाहेर काढता न आल्याने जागेवर वाळत होता. यासाठी मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून रस्ता करून देण्यात येईल, असे आश्वस्त केले होते; मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे उमेश खडके यांनी तहसीलदारांच्या दालनातच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसऱ्या प्रकरणात पार्वतीबाई बाबासाहेब कवडे व त्यांचा मुलगा संजय बाबासाहेब कवडे यांचे स. नं. ८७८, ८७९, ८८० व ८८१ मध्ये पूर्वापार सुरू असलेला रस्ता सिमेंट नाली झाल्यामुळे बंद झाला असल्याने तेही येथे आले होते. यावेळी संजय कवडे यांनीदेखील अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव, नायब तहसीलदार भालचंद्र यादव व तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कपिल पाटील यांनी प्रसंगावधान राखून सदर शेतकऱ्यांच्या हातातील डिझेलचा डब्बा व काडीपेटी काढून घेत त्यांना शांत करून रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, या प्रकरणात मंडळ अधिकारी दत्तात्रय प्रेमदास गायकवाड यांनी वाशी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. यात शेतकरी संजय बाबासाहेब कवडे व उमेश विश्वनाथ खडके या दोघांनी तहसीलदार नरसिंग जाधव हे शासकीय कामकाज करत असताना ‘रस्ता का करत नाहीत’, असे म्हणत आरडाओरड करून अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे. यावरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शंकर लोंढे करीत आहेत.