उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लादतेवेळी हातावर पोट असलेल्यांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.
संचारबंदीमुळे बहुतांश नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. यातील बहुतांश नागरिकांना स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत रेशनचे धान्य उपलब्ध करून दिले जाते. या वर्गाचा रोजगार बुडाल्याने त्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एप्रिल महिन्यात अनेकांनी रेशन घेतले असल्याने मे महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बघता मोफत धान्य वितरणादरम्यान प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराला दुकानात लाभार्थींची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय दररोज किती लोकांना व कोणत्या लोकांना धान्य वाटप करण्यात येईल, याचे नियोजन करावे लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने संचारबंदी लागू केली. यासोबतच मोफत धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. शासनाचा हा निर्णय समाजातील दुर्बल घटकांसाठी फायद्याचा आहे.
सिद्धार्थ शिंदे, लाभार्थी
संचारबंदी उन्हाळाभर चालणार आहे. त्यामुळे केवळ एक महिना धान्य पुरवून कसे चालणार, जून व जुलै महिन्यातही मोफत व दुप्पट धान्य देण्याची गरज आहे. त्यासोबतच तिखट, डाळ, साखरही द्यावी.
मदिना फकीर, लाभार्थी
स्वस्त धान्य योजनेअंतर्गत कुटुंबाचे धान्य खरेदी करण्यासाठी ७० ते १०० रुपये एवढाच खर्च येतो. शासन मोफत धान्य देत आहे. त्यामुळे ७० ते १०० रुपये खर्च वाचणार आहे. १ व्यक्तीला ५ किलो धान्य महिनाभर पुरत नाही. शासनाने मोफत धान्याऐवजी दुप्पट धान्य द्यावे.
ज्ञानेश्वर साळुंखे, लाभार्थी
राज्य शासनाने एक महिना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने धान्य वाटप केले जात आहे. एप्रिल महिन्यात लाभार्थींनी धान्य खरेदी केले आहे. त्यामुळे मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित केले जाणार आहे.
चारुशिला देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी
गहू आणि तांदळाचा समावेश
रेशन कार्डधारकांना शासनाच्या वतीने गहू व तांंदूळ दिला जाणार आहे. रेशन दुकानदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालक करावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.