उमरगा : इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदवित महागाई तत्काळ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, सततच्या इंधन दरवाढीमुळे व महागाईमुळे जगणे मुश्कील झाले असून, काम धंदे नसल्याने व नोकऱ्या गेल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोना महामारीत वैद्यकीय खर्चात मोठ्या प्रमाणावर लूट झाली असून, व्यापाऱ्यांना संचारबंदीचे नियम पाळून व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही सरकार मात्र वेगवेगळ्या बहाण्याने दंडाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे. त्यातच आता महागाईने कळस गाठला आहे. सरकारने ही महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, पृथ्वीराज चव्हाण, रंजित बिराजदार, वजीर शेख, नागेश सगर, चंद्रकांत मुगळे, संजय राठोड, शुभम माने, पवन बिराजदार, महेश लोखंडे, आयान शेख, स्वप्नील शिंदे, चाँद फकीर, अग्नेश सगर, चाँद मकानदार, पिंटू राठोड, राम दुर्गे, कृष्णा जमादार आदी उपस्थित होते.