उस्मानाबाद : मराठवाड्यास पश्चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या येडशी-टेंभुर्णी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असून, प्रस्तावित १० मीटरऐवजी हे काम १५ मीटर रुंदीने करावे, अशी मागणी खा.ओम राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी संसदेत केली.
टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी हा महामार्ग मराठवाड्यास पश्चिम महाराष्ट्र तथा मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरून लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्हे जोडले जातात, तसेच या तिन्ही जिल्ह्यातील बहुतांश वाहतूक या रस्त्यावरूनच सुरू असते. या महामार्गाच्या १६३ किमीपैकी १०१ किलोमीटरचा रस्ता हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून जातो. सध्या या महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने, टेंभुर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, हाच रस्ता पुढे लातूरला जोडला जातो. येडशी ते लातूर
दरम्यान, हाच रस्ता १५ मीटर रुंद करण्याचे काम सुरू आहे, तर टेंभुर्णी-येडशी हा रस्ता केवळ दहा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी हा रस्ताही पंधरा मीटर रुंद करणे आवश्यक असून, त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी करीत खा.राजेनिंबाळकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.