-अविनाश कुबल, पर्यावरणतज्ज्ञनद्या निर्मल आणि शुद्ध पाण्याचा अविरत पुरवठा करून तिच्या आसपासच्या प्रदेशातील सर्व वनस्पती आणि प्राण्यांना जगवितात आणि अशा सर्व सजीवांचे जीवन समृद्ध करते म्हणून नदीला सजीवांना जीवन देणारी या अर्थाने जीवनदायिनी असे म्हटले जाते; परंतु हेच नदीमधून वाहणारे पाणी प्रदूषित झाल्यानंतर निरुपयोगी ठरते; परंतु मुळात हे जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून आणि या नद्या प्रदूषित होतातच कशा? हा प्रश्न समोर येतो. याचे उत्तर आहे, नदीच्या काठावर वसलेल्या नागरी वस्त्यांमध्ये म्हणजे गावांमध्ये आणि शहरांद्वारे तयार होणारे सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते, त्याचप्रमाणे नद्यांच्या जलस्त्राव क्षेत्रात कार्यरत असलेल्या कारखाने आणि उद्योगांचे सांडपाणीसुद्धा आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडले जाते.
हे नद्यांच्या प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्याच कारणाने अशुद्ध पाणी ज्याला आपण सांडपाणी म्हणतो ते पुन्हा शुद्ध केल्याशिवाय नदीच्या पात्रात सोडले जाऊ नये, असा संकेत आहे.
नदीच्या पात्रात अस्तित्वात असलेली जीवसृष्टी अर्थात वनस्पती आणि प्राणी यांच्या अस्तित्वासाठी हा फार मोठा विषय आहे. पाण्यामध्ये फोफावणारी जलपर्णी नावाची वनस्पती त्या-त्या भागामध्ये वाढत असलेली दिसून येते. त्या-त्या ठिकाणी नदी प्रदूषित झाल्याचे ठामपणे म्हणता येते. तसेच नदीच्या पाण्याचा रंगीतपणा किंवा गढूळपणा, नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा, त्या पाण्यापासून येणारी दुर्गंधी ही इतर लक्षणे नदी प्रदूषित झाल्याची लक्षणे आहेत.
प्रदूषित झालेल्या नदीच्या पात्रात असलेले हे सजीव अर्थात वनस्पती अर्थात पाणवनस्पती, शेवाळ, गवत, इत्यादी, तसेच प्राणी अर्थात मासे, कासव, बेडूक असे जलचर आणि उभयचर प्राणी नष्ट झाल्याने नदीच्या नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण होण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. परिणामी अशुद्ध पाण्याचे वहन करणाऱ्या नद्या जीवनदायिनी न रहाता केवळ अशुद्ध पाण्याचा प्रवाह असे त्यांचे स्वरूप होते. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात आपल्या सर्वच नद्या या अवस्थेला येऊन ठेपल्या आहेत.
एका आकडेवारी अनुसार महाराष्ट्रातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण ९७५८.५३ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) इतक्या सांडपाण्याची निर्मिती होते; परंतु सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अंदाज घेतला असता आतापर्यंत त्यापैकी केवळ ७७४७.२४ एमएलडी इतक्याच सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाऊ शकते इतकी क्षमता विकसित करण्यात आली आहे.
शिवाय या विकसित क्षमतेपैकी किती सांडपाणी प्रकल्प प्रत्यक्षात त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करतात आणि किती सांडपाणी प्रकल्प जलशुद्धीकरणाचे काम प्रत्यक्षात १००% योग्यतेने करतात याबद्दल ठामपणे सांगितले जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. असे म्हणण्याचे कारण काय तर जर का हे सर्व प्रकल्प जर का त्यांच्या १००% क्षमतेने आणि योग्यप्रकारे काम करत असते तर राज्यातील कोणतीही नदी प्रदूषित अवस्थेत दिसलीच नसती; परंतु दुर्दैवाने प्रत्यक्ष परिस्थिती तशी नसल्यामुळेच आपल्या राज्यातील जवळपास सर्वच नद्या प्रदूषित स्वरूपात आहेत.
राज्यात तयार होणारे सांडपाणी हे संपूर्ण देशामध्ये निर्मित होणाऱ्या सांडपाण्याच्या १३% इतके आहे.
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या अनेक नद्या या राष्ट्रीय नद्या आहेत ज्यामध्ये ‘गोदावरी’, ‘कृष्णा’ आणि ‘भीमा’ अर्थात ‘चंद्रभागा’ यांचा समावेश आहे. गोदावरी नदीच्या महाराष्ट्रातून वाहणाऱ्या भागाचे प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र शासनाद्वारे २०७.४१ कोटी रुपये मंजूर केले होते. ज्याअंतर्गत राज्यात सात मोठ्या शहरांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले. १८५.४६ एमएलडी सांडपाण्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया करणे आवश्यक होते; परंतु त्यापैकी किती काम झाले आणि नदी किती स्वच्छ झाली, हा संशोधनाचा विषय आहे. ‘भीमा’ अर्थात ‘चंद्रभागा’ नदीच्या जलप्रदूषणाबद्दल विचार केला असता, ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर मोठा गाजावाजा करून ‘नमामी चंद्रभागा’ प्रकल्प सुरू कण्यात आला होता; परंतु आजही केवळ एकट्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून सुमारे ५० एमएलडी इतके सांडपाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. इतकी गंभीर परिस्थिती आहे. राज्यातील नद्यांच्या जलप्रदूषणाच्या या प्रश्नाकडे आपण फार मोठ्या प्रमाणात आणि गंभीरपणे लक्ष द्यायला हवे.