- अमोल उदगीरकर, चित्रपट अभ्यासक‘लक बाय चान्स’ या सुंदर सिनेमात ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनय शिकविणारा प्रशिक्षक विद्यार्थ्यांना सांगतो, ‘हॉलिवूड फिल्ममध्ये हिरो बनणं सोपं असतं, पण बॉलिवूडचा हिरो बनणं फार अवघड! तो फक्त अभिनय करत नाही, गाणं म्हणतो, डान्स करतो, कॉमेडी आणि ॲक्शनही करतो. बॉलिवूडचा हिरो बनायला तुमच्याकडे खूप काही असावं लागतं. हे झालं सर्वसामान्य हिरोबद्दल.
भारतीय सिनेमातला महानायक बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागत असेल, याची यादी तर न संपणारी आहे. प्रेक्षकांच्या अवास्तव अपेक्षा खांद्यावर वाहून न्याव्या लागतात, आपली चूक नसली तरी मूग गिळून लोकांच्या शिव्या खाव्या लागतात, ऑफ स्क्रीन पण आपल्या हातून काही चुकीचं होत नाही नं याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं... अजून अजून काय काय करावं लागतं. हे परफेक्शनचं ओझं सतत खांद्यावर वाहत राहणं खूप थकवून टाकणारं असतं. स्वतःमध्ये अनेक दोष असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपला महानायक परिपूर्ण असावा, असं वाटणं हा एक खास भारतीय विरोधाभास. त्यासाठी महानायकाला मोठी किंमत चुकवावी लागते. महानायकावर प्रेम करणारे लाखो लोक, पण त्याच्या खऱ्या आयुष्यातले गुण-दोष आणि त्याचं परफेक्ट नसणं समजून घेणारे खूप तुरळक लोक असतात किंवा नसतात. महानायक असणं ही खूप एकटं करून जाणारी गोष्ट आहे. अमिताभ बच्चन नावाचा महानायक ही एकाकी भूमिका भारतासारख्या खंडप्राय देशाच्या मंचावर गेल्या काही दशकांपासून निभावत आहे.
बॉलिवूडच्या नायकांच्या देखणेपणाच्या पारंपरिक व्याख्येत न बसणारा, त्याकाळातल्या निर्मात्यांच्याच भाषेत सांगायचं तर घोड्यासारखा चेहरा असणारा, लंबुटांग, हवा आली की ‘झुल्फे’ न उडणारा अमिताभ बच्चन इथं महानायक सोडा; साधा हिरो होईल, असंही कुणाला वाटलं नसेल. पण बच्चन आला, टिकला आणि बघता बघता त्याच्या महानायकत्वाने अक्राळविक्राळ स्वरूप घेतलं. त्याचे समकालीन नायक त्याच्यासमोर पिग्मी वाटायला लागले. बच्चनचं महानायक असणं फक्त बॉक्स ऑफिसवरच्या दणदणीत गल्ल्यापुरतं संकुचित नव्हतं. त्याच्या सुपरस्टारडमला तत्कालीन सामाजिक संदर्भ होते. पहिल्यांदाच प्रेक्षक स्वतःला पडद्यावरच्या नायकात बघत होता. यात सलीम जावेदच्या लिखाणाइतकाच बच्चनच्या इंटेन्स अभिनयाचा पण वाटा होता. सत्तरच्या दशकात बच्चन आभाळाइतका मोठा झाला. त्या काळात स्वातंत्र्यानंतरचा रोमँटिसिझम जवळपास लयाला गेला होता.
भ्रष्टाचार आणि लायसन्सराजमुळे जनतेत साचलेल्या असंतोषाची वाफ बाहेर काढण्याचं काम बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ने केलं. गुंडांशी लढणारा, नेत्यांना जाब विचारणारा, सरकारी बाबूंचं बखोट पकडणारा नायक व्यवस्थेनं गांजलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना अपील झाला नसता तर नवलच. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सर्वसामान्य माणसाची उर्मी बच्चनने थिएटरच्या अंधारात पूर्ण केली. बच्चनचा महानायक एकाचवेळेस ‘असंतोषाची खिडकी’ होता आणि एकाचवेळेला ‘ग्लॅडिएटर’ होता. तो नेमका कोण होता, हे तुम्ही कुठल्या चष्म्यातून बघताय, यावर अवलंबून होतं.
‘अँग्री यंग मॅन’ ते ‘ग्रँड ओल्ड मॅन’पर्यंतचा एका महानायकाचा हा प्रवास! हा कुठंतरी आपल्यासारखाच गुणदोषांचा समुच्चय असणारा माणूस आहे, असं बच्चनबद्दल वाटणं हे त्याला वेगळं बनवतं. त्याच्यावरचे अनेक आरोप, त्याच्यातले दोष बच्चनला मर्त्य पातळीवर आणून ठेवतात, हे फार लोभसवाणं आहे. त्याच्या परिपूर्ण नसण्यात एक मजा आहे. बच्चन नावाचा हा अपरिपूर्ण महानायक फक्त भारतात होऊ शकतो. उर्वरित जगाच्या नशिबी असा महानायक होणे नाही! amoludgirkar@gmail.com