Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

By यदू जोशी | Published: June 7, 2024 09:18 AM2024-06-07T09:18:27+5:302024-06-07T09:19:01+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने लीड मिळविली आहे. म्हणजे राज्याची सत्ता आत्ताच मविआने हिसकावली आहे! 

BJP's Shendur has come down, Congress has ascended! | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

 - यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)

‘महाराष्ट्रात सगळ्या प्रमुख पक्षांच्या ताटात थोडेथोडे पडेल, एक ताट पंचपक्वानाचे, तर दुसरे अगदीच रिकामे असे होणार नाही’ असे निकालापूर्वी लिहिले होते. त्याचा प्रत्यय आला आहे. तरीही भाजपची इतकी वाताहत होईल असे वाटले नव्हते.  पक्षाचे दिग्गज महाराष्ट्रात हरले. 'इस जमीं से आसमां तक मैं ही मैं हुँ, दुसरा कोई नही’ असे दिल्लीपासून खालपर्यंत अनेकांना वाटत होते, पण मतदाराच्या हिशेबाची वही वेगळीच असते. पाच वर्षांतून एकदाच तो  ती काढतो आणि सगळे हिशेब बरोबर करतो. ‘डान्स ऑफ डेमॉक्रसी’मध्ये आपण पब्लिकला नाचवतो असे नेत्यांना वाटते, पण मतदार पाच वर्षांतून एकदाच नेत्यांना नाचवितो. गावातल्या मारुतीच्या मूर्तीला लोक महिनोगणती शेंदूर लावतात मग त्याचे थर खूप साचले की ती खळ कधीतरी काढली जाते. महाराष्ट्रात भाजपचा शेंदूर तसाच उतरला आहे. नव्याने शेंदूर लावायला आता खूप कसरत करावी लागेल. आता हा शेंदूर इतकी गेली काही वर्षे खळ उतरलेल्या काँग्रेसला लागला आहे. 

अर्थशास्त्राचा एक नियम आहे : ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स’. एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर त्यापुढे जाता येत नाही, खाली येणे अटळ असते. विविध कारणांनी भाजप व महायुती अशीच खाली आली. भाजपमधील काही नेत्यांना ‘फ्लाय बाय नाइट ऑपरेटर्स’ म्हणजे रात्रीच्या अंधारात कामे आटोपणाऱ्यांनी घेरले आहे. हे  लोक  दिवसाही अंधारातलीच कामे करतात; त्यांना दूर ठेवावे लागेल. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या ही तर महायुतीसाठी धोक्याची घंटा आहेच; पण दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआने लीड मिळविली. राज्यात सत्तेत बसायला १४४ आमदार लागतात, लोकसभेचा इफेक्ट विधानसभेतही कायम राहील असे मानले तर मविआ आत्ताच सत्तेत आली आहे. लोकसभेतील अपयश दिल्लीच्या कोर्टात ढकलता येते, पण राज्यात अपयश आले तर ते शिंदे-फडणवीस-अजित पवारांचेच असेल. दिल्ली महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना निर्णयस्वातंत्र्य देत नाही, उलट आपल्या तालावर नाचायला सांगते. एकेकाळी इंदिराजी काँग्रेसमध्ये तसेच करायच्या. दिल्लीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मोकळीक दिली नाही तर लोकसभेपेक्षाही वाईट स्थिती होईल. लोकसभेच्या वेळी तर शिंकायचे असले तरी दिल्लीहून परवानगी घ्यावी लागत होती. 

जी काँग्रेस सेकंड क्लासमध्येही येणार नाही असे भाजपला वाटत होते, त्या काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून डिस्टिंक्शन मिळविले आहे. काँग्रेसचे असे ताकदवान होणे भाजपला परवडणारे नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर अशा काँग्रेस नेत्यांची दमदार फळी उभी झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले आहे. सोबत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेतच. एकमेकांशी भांडत बसणारी काँग्रेस आज दिसत नाही, पक्षासाठी हे चांगले लक्षण आहे आणि अशा ताकदीला शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे महाबळ मिळाल्याने भाजपची डोकेदुखी विधानसभेतही वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बरेच नेते काँग्रेस वा इतर पक्ष सोडून भाजप, शिंदेसेनेत गेले. विधानसभेपूर्वी तसे फारसे होणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींकडे विधानसभेसाठी लढू इच्छिणाऱ्यांची मोठी गर्दी असेल.  संधी मिळणार नाही तेच फक्त इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारतील. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जो मोठा फटका महायुतीला बसला आहे ते पाहता या पट्ट्यात इतर पक्षांतून आपल्याकडे आलेेल्यांना सांभाळून ठेवण्याची कसरत भाजप, शिंदेसेनेला करावी लागू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षसंघटनेत काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे, नेतृत्वाने त्यास मान्यता दिली तर राज्यात त्याचा फायदाच होईल. ते होईल- न होईल, पण निवडणुकीआधी प्रदेश भाजपमध्ये मोठे बदल होतील असे वाटते. हे बदल कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घेऊन त्या आधारे केले गेले तरच फायदा होईल. नाहीतर आताचे कपड्यांची घडीही मोडू न देणारे आणि रोज कलप लावणारेच पुन्हा येतील. 

फडणवीस यांनी एकट्यानेच राजीनामा का द्यावा? - राज्यातील पराभवाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि मुंबईतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून आशिष शेलार यांनीही  तो दिला पाहिजे असे भाजपचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.  विरोधात गेलेली जातीय समीकरणे आपल्या बाजूने करणे, शेतकऱ्यांची नाराजी दूर करणे, भाजपमधली मरगळ दूर करणे, पक्षात विशिष्ट लोकांनाच मिळते आणि बाकीच्यांना कोणीही विचारत नाही ही भावना दूर करणे, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या आक्रोशाकडे लक्ष देणे, राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावणे अशा अनेक गोष्टी महायुतीला कराव्या लागणार आहेत. बाहेरच्यांचा मुकाबला करताना अंतर्गत घडी बसविण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले विरुद्ध झालेला लोकसभेचा सामना एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार पूर्णपणे हरले आहेत; आता विधानसभेचा पिक्चर बाकी आहे.                

Web Title: BJP's Shendur has come down, Congress has ascended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.