शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

टीका हा तर लोकशाहीचा आत्मा!

By विजय दर्डा | Published: April 10, 2023 7:15 AM

सत्तापक्षावर टीका करणे याचा अर्थ देशाला विरोध करणे असा नव्हे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वपूर्ण आहे!

डाॅ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

सत्तापक्षावर टीका करणे याचा अर्थ देशाला विरोध करणे असा नव्हे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वपूर्ण आहे!

भारत, अमेरिका, चीन, रशिया, अरब देश किंवा त्या प्रकारच्या अन्य देशांत काय फरक आहे? फरक आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिसू शकतो. या देशांची आर्थिक शक्ती, लष्करी ताकद किंवा जनजीवनाची परिस्थिती लक्षात घेऊन व्याख्या करता येऊ शकते. परंतु, माझ्या मते, ‘लोकशाही असणे’ किंवा ‘नसणे’ ही या व्याख्येतली सर्वांत कळीची गोष्ट होय. भारत किंवा अमेरिकेत आपण आपल्या मनात जे असेल ते बोलू शकतो. देश किंवा राज्यातल्या सरकारशी आपला एखाद्या मुद्द्यावरून मतभेद असेल, तर तो आपण जाहीर करू शकतो. परंतु, चीन, रशिया, अरब देश किंवा हुकूमशाही सत्तापद्धत असलेल्या आफ्रिकी देशांमध्ये तुम्ही तुमच्या  मनातले बोलाल, तर तुरुंगात जाल; किंवा गुपचूप तुम्हाला अशा ठिकाणी पाठविले जाईल की कुणाला पत्ताही लागणार नाही.‘टीका’ हा लोकशाहीचा खरा प्राण,  आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हेच सत्य पुन्हा एकदा स्थापित केले आहे.मल्याळम भाषेतील एका टीव्ही वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रतिबंध लावले गेले होते. केरळ उच्च न्यायालयाने सरकारच्या या आदेशास वैध ठरवले; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने तो आदेश अवैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की सत्य मांडणे हे माध्यमांचे कर्तव्यच आहे. कटू असली तरी माध्यमांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे. असे झाले तरच लोकशाहीला बळकट करणारे पर्याय त्यांना निवडता येतील. सामाजिक, आर्थिक, राजकारणापासून विविध विचारप्रणालींपर्यंत सगळीकडे एकसाची विचार असतील तर हा लोकशाहीला धोका होय! राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाने नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेचे दावे हवेत करता येणार नाहीत. ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतील़!- सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या या सर्व मुद्द्यांचे मी अंत:करणपूर्वक स्वागत करतो.मानवी संस्कृतीच्या विकासयात्रेच्या इतिहासात मी  वाचले होते की टीकात्मक चिंतनामुळेच मनुष्य ही यात्रा करू शकला. चिंतनात स्वाभाविकपणे अनेक विचार प्रकट होतात. या विचारांचे विश्लेषण आपल्याला नवा रस्ता दाखवते. आपलीच विचारधारा सर्वांत चांगली आहे, असे एखाद्या माणसाने म्हटले तर जीवनात नवे विचार कसे उत्पन्न होतील? इतके सगळे धर्म, इतक्या सगळ्या परंपरा आणि इतक्या संस्कृतींच्या जन्माच्या मुळाशी विचारांची भिन्नताच आहे. भारतात जवळपास १४० कोटी लोक आहेत. इतक्या सगळ्या लोकांचे विचार, श्रद्धा एकसारख्या कशा असू शकतील? आणि तसे समजा झाले,  तर ती किती धोकादायक गोष्ट असेल! आपल्याकडे एक म्हण आहे : प्रत्येक १०-२० कोसांवर भाषा, वेशभूषा आणि बोली बदलत जातात. सर्वांचे आपले आपले विचार असतात आणि एकत्रित स्वरूपात तेच देशाला बळ पुरवत असतात.भारतीय लोकशाहीच्या विचारयात्रेत वाद-विवादांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आणीबाणी लावण्याची गरज आहे, असे इंदिरा गांधीना वाटले परंतु जनतेने त्यांचा हा विचार पूर्णपणे बाजूला सारला. ए. आर. अंतुले आणि जगन्नाथ मिश्रा यांनी टीकेचे स्वर रोखण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देशात आंदोलन पसरले; कारण विचारांवर बंदी लादण्याचा साधा अर्थ लोकशाहीला कुलूप ठोकणे होय.स्वातंत्र्य आंदोलनातले  नेते या गोष्टी जाणून होते. त्यामुळे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  प्राधान्य दिले.  वृत्तपत्रांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात एक प्रसंग मला आठवतो.  पंडित नेहरूंच्या वाढदिवसानिमित्त हरिवंशराय बच्चन यांनी एक कविसंमेलन  आयोजित केले होते. बच्चनजींना भेटायला त्याचवेळी जनकवी बाबा नागार्जुनही आले. इंदिराजींनी त्यांनाही कविसंमेलनाचे आमंत्रण दिले. पण नागार्जुन म्हणाले, ‘इंदू, माझ्या कविता तुझे वडील ऐकू शकणार नाहीत.’ इंदिराजी म्हणाल्या, ‘आपण जरूर या, ते नक्की ऐकतील.’ - त्या कविसंमेलनात बाबा नागार्जुन यांनी नेहरूंवर कठोर टीका करणाऱ्या कविता वाचल्या आणि कमाल म्हणजे नेहरूजींनी शांतपणे त्या कविता ऐकल्याही. वास्तवात या कविता सत्तेच्या विरुद्ध जनआक्रोशाची अभिव्यक्तीच होती. या आक्रोशाला शब्द देण्याचे काम अखेर कुणी  कवी, शायर, लेखकच करील ना! हे टीकेचे स्वर अखेर माध्यमेच समाजापुढे मांडतील ना!मला एक घटना आठवते. लोकमत टाइम्सच्या उद्घाटनासाठी ए. आर. अंतुले औरंगाबादला (आता छत्रपती संभाजीनगर) आले होते. नेमके त्याच दिवशी “लोकमतने अंतुले यांच्यावर एक व्यंगचित्र छापले. अंतुले आधी नाराज झाले; परंतु नंतर शांतही झाले. त्यावेळी अंतुलेंच्या मंत्रिमंडळात माझे वडील श्री. जवाहरलाल दर्डा उद्योगमंत्री होते. त्याआधी आणिबाणीच्या विरुद्ध लोकमतने काही बातम्या छापल्या तेव्हा लोकांनी इंदिराजींकडे तक्रार केली. इंदिराजींनी माझ्या बाबूजींना विचारले,  ‘लोकमत हे काय करत आहे?’  बाबूजींनी अत्यंत शालीनतापूर्वक उत्तर दिले, ‘लोकमत वर्तमानपत्राची भूमिका बजावत आहे.’- कोणत्याही परिस्थितीत टीकेचा प्रत्येक स्वर हा शालीनच असला पाहिजे. एकमेकांबद्दल कुठलाही वैरभाव असता कामा नये. आणि हो,  अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या विरोधात बोलणे नव्हे! त्याबाबतीत मर्यादेची एक रेषा नक्कीच असली पाहिजे. सत्तेवर भले कोणीही असेल, आपण एका ठरलेल्या वेळेपुरते रखवालदार आहोत, हे त्याने समजून असले पाहिजे. देशाची खरी सत्ता जनतेच्या हातात असते. टीकेचा अधिकार लोकांकडे आहे. लोकशाहीची हीच ताकद आहे. आपल्या लोकशाहीचा अभिमान बाळगा. लोकशाहीला धक्का लागेल असे कोणतेही काम कुणीही करता कामा नये!

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय