रिसेप्टायिप एर्डोगन यांची तुर्कस्तानच्या अध्यक्षपदी परवा झालेली निवड, लोकशाहीच्या मार्गाने आणता येऊ शकणाऱ्या हुकूमशाहीचा धडा जगाला शिकविणारी आहे. एर्डोगन हे २००२ पासून म्हणजे गेली तब्बल १६ वर्षे तुर्कस्तानच्या अध्यक्षपदावर आहेत. २०१६ मध्ये त्यांनी त्या देशातील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य संपवले. सरकारवरील टीकेवर बंदी आणली आणि विरोधी पक्षांवर निर्बंध लादले. लोकांना दीपवून टाकणारा पण प्रत्यक्षात आपले अधिकार वाढवून घेणारा कार्यक्रमही त्यांनी याच काळात देशात राबविला. सरकारच्या सर्व विभागांवर आपला अधिकार त्यासोबतच्या वचकानिशी कायम केला. ‘देशाला बाहेर जसे शत्रू आहेत तसेच ते देशातही आहेत. त्यांना संपविण्यासाठी अध्यक्षपदाला जास्तीचे अधिकार हवे आहेत’ ही गोष्ट ते निवडणुकीच्या प्रचारकाळात बोलत होते. निवडणुकीनंतर झालेल्या आपल्या विजयसभेतही त्यांनी तिचा पुनरुच्चार केला. प्रत्यक्षात त्यांना ५२ टक्के मते मिळाली तर त्यांच्या विरोधात ४८ टक्के लोकांनी मतदान केले. मतांची ही टक्केवारी त्या देशातील वैचारिक दुभंगावर प्रकाश टाकणारी आहे. निम्म्याएवढे लोक आपल्या विरोधात मतदान करतात हे दिसत असतानाही ‘मला मत देत नाहीत, ते माझेच नव्हे तर देशाचेही शत्रू आहेत’ अशी जी मानसिकता जगातील सगळ्या हुकूमशहांनी अंगिकारली असते तीच या एर्डोगन यांनीही स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ते आपल्या निम्म्या देशाचा ‘बंदोबस्त’ करतील असे साºया जगात मानले जाऊ लागले आहे. २०१६ मध्ये त्यांनी आपल्या ५० हजार विरोधकांना तुरुंगात डांबले तर एक लाखाहून अधिक शासकीय अधिकारी व कर्मचारी सरकारी सेवेतून काढून टाकले. आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी फेतुल्ला गुलेन यांना ती माणसे मदत करतात असा आरोप त्या साºयांवर एर्डोगन यांनी केला आहे. त्यानंतरच्या काळात देशातील विद्यार्थ्यांच्या संघटना, कामगारांच्या संघटना व प्रत्यक्ष न्यायव्यवस्था यांच्यावरही त्यांनी आपले नियंत्रण कायम केले आहे. ‘मी आहे म्हणून तुर्कस्तान आहे, मी म्हणजेच राष्ट्र व मी म्हणजेच तुमची सुरक्षा’ ही हिटलरने वापरलेली भाषा एर्डोगनही वापरतो. एर्डोगनच्या निवडीनंतर त्यांचे स्वागत ज्यांनी केले ते नेतेही असेच लोकशाहीच्या मार्गाने सर्वाधिकारी झालेले किंवा होऊ पाहणारे आहेत. हंगेरीचे कडव्या उजव्या विचारांचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन, रशियाचे व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे अभिनंदनपर स्वागत केले आहे. हे तिघेही लोकशाहीचा वापर करून सर्वाधिकारी बनू पाहणारे पुढारी आहेत. आपल्या देशातील विरोधकांना ज्या कोणत्या मार्गाने संपविता येईल वा बदनाम करता येईल ते सगळे मार्ग अवलंबणारे हे पुढारी आहेत. आमच्यावरची टीका म्हणजे देशावरची टीका, आम्हाला विरोध म्हणजे धर्माला विरोध आणि आमचे विरोधक ते देशाचे शत्रू अशी एर्डोगनछाप भाषा आता आपल्याही देशात बोलली जाऊ लागली आहे हे ध्यानात घेतले की आपलीही राजकीय वाटचाल पुन्हा एकवार नीट तपासून पाहण्याची गरज आपल्यापुढे उभी राहते. मोदींच्या विरोधकांना पाकिस्तानात पाठवू, आमच्या पक्षावर टीका करणारे कुत्रे वा कुत्र्या आहेत किंवा आम्हीच केवळ देशभक्त असून इतरांसमोर देशाचा विचार नाही अशी भाषा आपल्या देशात कोण बोलतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र ही भाषा एर्डोगनसारखी प्रत्यक्षात राजकीय एकाधिकाराचे स्वरूप धारण करू शकते हे अशावेळी समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका राजकीय पाहणीनुसार आज जगात ३९ हुकूमशहा आहेत. ५० वर्षांपूर्वी त्यांची संख्या ८९ होती. येत्या २५ वर्षात हे सारे हुकूमशहा संपतील आणि त्यांच्या देशात लोकशाही राजवटी येतील असे राजकीय अनुमान राजकारणाचे जाणकार सांगतात. मात्र एर्डोगनसारख्यांचा उदय या अनुमानाच्या विरुद्ध जाणारा आहे.
निवडणुकीतून येणारी हुकूमशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:50 IST