शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:37 IST

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते.

एसटी किंवा रेल्वेला प्रमाणापेक्षा उशीर झाला की प्रवासी जवळच्या सामानाच्या पिशव्या डोक्याखाली घेऊन फलाटावर अंग टाकतात, सोबत आणलेली शिदाेरी सोडून तिथेच चार घास पोटात ढकलतात. गाड्यांना उशीर करणाऱ्या व्यवस्थेला शिव्या घालत तासन् तास घालवले जातात. सगळे वातावरण कमालीचे आळसावलेले असते. एसटी किंवा रेल्वे ही गोरगरिबांची, सर्वसामान्यांची प्रवासाची साधने. तिथे हे असे चित्र दिसण्यात नवे काही नाही. परंतु, समाजातील उच्चभ्रूंच्या प्रतिष्ठेचे चिन्ह मानल्या जाणाऱ्या विमानतळांवर हेच चित्र दिसेल असे वाटले नव्हते. ते सोमवारी मुंबईच्या विमानतळावर दिसले. आजूबाजूला उभ्या विमानांच्या पृष्ठभूमीवर प्रवाशांनी जेवणासाठी जमिनीवरच आलकट-पालकट मारली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. कारण, धूर व धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिवसभर विमाने उडालीच नाहीत. पहाटे किंवा सकाळी विमानतळावर पोहोचलेल्यांचा पूर्ण दिवस धुरकट वातावरणात गेला.

विमान कंपन्यांचे कर्मचारी हतबल होते. विमानतळाच्या इमारतींमध्ये उभे राहायलाही जागा उरली नव्हती. गेले दोन-तीन दिवस संपूर्ण देशभर हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे. आधीच या ना त्या कारणाने तिकिटाचे दर आकाशाला भिडलेले असतात. एखाददुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळ्या विमान कंपन्यांनी वेळापत्रकापासून फारकत घेतल्याचा अनुभव येतो. ठरलेल्या वेळेस विमानाने आकाशात झेप घेतली तर पेढे वाटावेत, अशी स्थिती असते. या सगळ्यांचा प्रवाशांना जो मानसिक, शारीरिक त्रास होतो त्याचे वर्णन शब्दांत शक्य नाही. उत्तर भारतात हवेचे प्रदूषण, धुक्याचे संकट अधिक गडद असते. नंतर धुके हळूहळू विरळ होत जाते. सकाळच्या उड्डाणांवर याचा नेहमीच परिणाम होतो. परंतु, दक्षिण भारतात तुलनेने स्थिती बरी असते. तरीदेखील देशाची संपूर्ण प्रवासी विमानसेवा प्रभावित का होते, तर अमूक एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत एकच विमान जाते किंवा येते असे नाही.

मेट्रो विमानतळे आणि काही छोटी शहरे यांना जोडणाऱ्या विमानांच्या अशा एका विशिष्ट वेळापत्रकानुसार विमान कंपन्या ही प्रवासीसेवा चालवितात. त्यामुळे एका विमानतळावर विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत की ते संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. म्हणूनच मुंबई विमानतळावर पंचवीस विमाने रद्द करावी लागली आणि आणखी पन्नास विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला की देशभरातील रद्द व उशीर झालेल्या विमानांची संख्या चौपट किंवा पाचपट होते. जिथे दृश्यमानता खूप खराब नाही अशाही विमानतळावरील सेवा विस्कळीत होते. अर्थात, केवळ प्रतिकूल हवामान किंवा धुके यामुळेच हा सावळागोंधळ सुरू आहे असे मानण्याचे कारण नाही. काही प्रवाशांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या अनुभवानुसार वैमानिक उपलब्ध न होणे किंवा अन्य तांत्रिक कारणेही विमान कंपन्यांनी खुलेपणाने प्रवाशांना सांगितली नाहीत. त्याऐवजी केवळ प्रतिकूल हवामानाचे कारण पुढे करीत प्रवाशांची दिशाभूल करण्यात आली. हे प्रवासी दिल्लीवरून सकाळी बंगळुरूला निघाले होते आणि त्यांचा लहान मुलगा घरी त्यांची वाट पाहात होता. त्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत रात्री दहा-साडेदहाच्या आत घरी पोहोचणे गरजेचे होते.

अशावेळी दिवसभरात चार-पाच वेळा धुक्याचे कारण देत दोन किंवा तीन तासांच्या उशिराची नुसतीच घोषणा होत राहिली आणि प्रत्यक्षात पायलटच वेळेवर पोहोचला नव्हता. अशावेळी प्रवाशांची सहनशीलता संपणे अजिबात अनैसर्गिक नाही. गोव्याला निघालेल्या अशाच एका प्रवाशाचा अन्य एका विमानात संयम सुटला व त्याने पायलटवर हात उचलला. हवाई प्रवासाची सगळी व्यवस्था, सहप्रवासी, माध्यमे या सगळ्यांनी त्या प्रवाशाला दोषी ठरविले. तथापि, कित्येक तास विमानात बसून राहावे लागलेल्या प्रवाशांसमोर येऊन वैमानिकांनी कोणती भाषा वापरली, याचाही थोडा विचार करायला हवा. हे सर्व चित्र पाहता देशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय विमानसेवेने जोडण्याची, रेल्वेच्या वातानुकूलित प्रथमश्रेणी तिकिटापेक्षा विमानाचे तिकीट कमी ठेवण्याची आणि परिणामी, हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई प्रवास शक्य करण्याची जी स्वप्ने काही वर्षांपूर्वी दाखवली गेली त्यांचे काय, हा प्रश्न येतोच. घड्याळाच्या काट्यावर कसरत करणाऱ्या देशवासीयांना एक विश्वासार्ह, काटेकोर वेळापत्रकावर चालणारी, किफायतशीर प्रवासी विमानसेवा देण्यात व्यवस्थेला आलेले अपयश यात अधिक ठळकपणे दिसते. दाट धुके हे केवळ निमित्त आहे.

टॅग्स :airplaneविमान