शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

संपादकीय - हरखून गेल्या वस्त्या, देहविक्रय हा देखील व्यवसायच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 06:09 IST

समाजाच्या मागास घटकांमधील मुली, महिला मुख्यत्वे या व्यवसायात येतात

‘देहविक्रय हादेखील व्यवसायच आहे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी तो व्यवसाय करणाऱ्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे’, या सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निवाड्याने देशभरातील अशा वस्त्या हरखून गेल्या नसत्या तरच नवल. गुलाल उधळून, मिठाई वाटून या वस्त्यांनी न्यायदेवतेला धन्यवाद दिले. हा निकाल ऐतिहासिक आहे. विशेषत: कोरोना महामारीमुळे जगभरातील माणसांच्या जगण्याची दूरगामी फेरमांडणी होत असताना मानवी वस्तीच्या पहिल्या दिवसापासूनच्या इतिहासात नोंद असलेल्या अगदी तळाच्या व्यवसायालाही या निकालाने प्रतिष्ठा मिळेल, हे अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना महामारीच्या काळात समाजातल्या इतर सगळ्यांचा विचार झाला, परंतु सगळे जगणे विस्कळीत झाल्यामुळे ओस पडलेल्या अशा वस्त्या व तिथे राहणाऱ्या अभागी जिवांकडे सुरूवातीला कुणाचे लक्ष गेले नाही. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना उदरनिर्वाहासाठी मदत दिली गेली. नंतर अन्य राज्यांनीही तसे पाऊल उचलले. पण, हे अपवादानेच. प्रत्येक संकटावेळी असे होतेच असे नाही. अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ओढणे, कुंटणखाना चालविणे किंवा मानवी तस्करी बेकायदेशीरच आहे. पोलिसांनी अशा घटनांमध्ये तपास करायलाच हवा. परंतु, राज्यघटनेत व्यक्तीचा सन्मान बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचा आहे, हा या निकालाचा मुख्य अर्थ!

समाजाच्या मागास घटकांमधील मुली, महिला मुख्यत्वे या व्यवसायात येतात. परंपरेने देहविक्रय करणारे काही समुदाय आहेत. त्यांची गावेही आहेत. अशा गावांमधून मोठ्या शहरांमध्ये मुली पाठविल्या जातात किंवा आणल्या जातात. कोवळ्या वयात त्या या व्यवसायात ढकलल्या जातात. हे केवळ बेकायदेशीर नाही तर अमानुषही आहे. त्याला प्रतिबंध बसावाच. परंतु, एकदा या व्यवसायात स्थिरावल्यानंतर प्रौढ स्त्रियांपुढे त्याशिवाय जगण्याचा अन्य पर्याय उपलब्ध नसतो. अशावेळी भारतीय राज्यघटनेनुसार व्यक्ती म्हणून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा, पोटापाण्यासाठी हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. ‘देहविक्रय करणाऱ्या महिलांना त्रास देऊ नका, त्यांना त्यांच्या मुलांपासून वेगळे करू नका’, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिली, हे बरे झाले. कारण, देहविक्रयाच्या अशा वस्त्या ही नागरी विकासाला लागलेली कीड समजून त्याविरूद्ध नाके मुरडणाऱ्या भाबड्या व बुर्झ्वा मंडळींमध्ये पोलीस अधिकारी पुढे असतात. अशा मंडळींना  अधूनमधून समाजसुधारणेची उबळ येते. परंतु, अल्पवयीन मुलींना या नरकात ढकलणारे, वेश्यालये चालविणारे बाहुबली किंवा त्यांना संरक्षण देणारे राजकीय पुढारी यांना हात लावला जात नाही. समाजाचा जो सर्वात दुबळा घटक म्हणजे जी अनिच्छेने या व्यवसायात ओढली गेली, तिला लक्ष्य बनवले जाते. याशिवाय, शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणच्या अशा वस्त्यांच्या जागा या छळाला कारणीभूत असतात. नागपूरच्या ‘गंगाजमुना’ वस्तीचे उदाहरण गेली वर्ष-दीड वर्ष याच कारणासाठी चर्चेत आहे. ही वस्ती वसली तेव्हा गावाच्या बाहेरच होती. शहर वाढत गेले तशी ती शहराच्या  मध्यभागी आली. मग तिथल्या जागेवर अनेकांची नजर पडली. मग ही वस्ती उठविण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून नाईलाजाने देह विकाव्या लागणाऱ्या महिलांना त्रास देणे सुरू झाले. योग्य पुनर्वसनाशिवाय त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न झाला. जी गोष्ट नागपूरची, तीच देशात सगळीकडची.

देशातील उच्च व सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीच्या जगण्याला प्रतिष्ठा देताना वेळोवेळी, ‘अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे, सज्ञान पुरुष व स्त्रीने लग्नाशिवाय एकत्र म्हणजे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणे, हा गुन्हा नाही किंवा समलैंगिक शरीरसंबंध बेकायदेशीर नाहीत, पुरूष व स्त्री याशिवाय तृतीयपंथी हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे’, असे निवाडे गेल्या काही वर्षांमध्ये दिले आहेत. देहविक्रेत्या महिलांविषयीचा हा निकाल त्याच रांगेतला किंबहुना त्याहून खूप महत्त्वाचा आहे. आता अशा महिलांचे आरोग्य व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, नोकरी-व्यवसाय याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. या महिला नरकयातना भोगतात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. अशा वंचित घटकांच्या पुढच्या पिढीत ज्ञानाची, प्रगतीची असोशी व स्वप्नांचा पाठलाग करताना अलौकिक क्षमता असते. त्या क्षमतेला वाव मिळाला, त्या मुलांना संधी मिळाली तर केवळ तेच नव्हे तर संपूर्ण देश पुढे जाईल.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायCourtन्यायालय