शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

आजचा अग्रलेख: शुभांगी, आम्हाला माफ कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:11 AM

Editorial : ज्या सामाजिक सुधारणांचा, प्रबोधनाचा आणि पुरोगामी परंपरेचा आपण अभिमान बाळगतो, त्यावर वारसा हक्क सांगायच्या लायक आपण आहोत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा घटना वारंवार घडत आहेत.

ज्या सामाजिक सुधारणांचा, प्रबोधनाचा आणि पुरोगामी परंपरेचा आपण अभिमान बाळगतो, त्यावर वारसा हक्क सांगायच्या लायक आपण आहोत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा घटना वारंवार घडत आहेत. पुण्यातील सातजणांच्या निर्घृण हत्याकांडाच्या बातमीची शाई वाळते ना वाळते तोच प्रेमसंबंधाच्या विरोधातून वडील, भाऊ आणि इतर नातेवाइकांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना समोर आली. संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना नेमक्या याच दिवशी ही घटना उघडकीस यावी, हा कसला दैवदुर्विलास? मानवी मूल्यांची, हक्कांची आणि अधिकारांची जपणूक करण्याची मुभा देणाऱ्या लोकशाही राज्यव्यवस्थेत एक सुजाण नागरिक म्हणून राहण्याची आपली अर्हताच अक्षम ठरविणारी ही घटना आहे. शिवाय, ती एकमेव नक्कीच नाही. जातीय अहंता आणि खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी अशा अनेक तरुण-तरुणींच्या नरडीला नख लावले गेले आहे.

नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी गावात राहणारी शुभांगी जोगदंड ही उच्चशिक्षित तरुणी होती. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या मुलीचा गुन्हा काय, तर गावातीलच एका तरुणावर जडलेले प्रेम! घरच्यांना ते मान्य नव्हते. प्रेम ही हळुवार भावना असते. अलवार वयात एखाद्याच्या प्रेमात पडणं, ही तशी नैसर्गिक बाब. प्रेमासाठी परवानगी घेणं अथवा घरच्यांना विचारून प्रेम करणं या दोन्ही गोष्टी अशक्यप्राय. तितक्याच हास्यास्पद; पण मुलांना खासगी मालमत्ता समजणाऱ्यांना हे कोण समजावून सांगणार? मुलगी मग ती सज्ञान असो की उच्चशिक्षित. कुटुंबाने आखलेली लक्ष्मणरेषा तिने ओलांडता कामा नये, ही अपेक्षाच मुळात गैरवाजवी. सामाजिक, जातीय चौकटी मोडून प्रस्थापित उंबरठा ओलांडणाऱ्या तरुण/तरुणींना जीवानिशी मारून टाकण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ ही बुरसटलेल्या मानसिकतेचे द्योतक आहे.

खर्ड्यातील नितीन आगेपासून ते सोनईतील हत्याकांडापर्यंत जातीय अहंकारातून निर्माण झालेल्या सूडभावनेने घेतलेल्या बळींची संख्या मोठी आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून पोटच्या मुलीला फासावर लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची घटना मागच्याच महिन्यात जालन्यात घडली. वैजापुरात तर जन्मदात्री माताच वैरीण निघाली. तिने लहान मुलाच्या सोबतीने मुलीचा जीव घेतला. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या’ (एनसीआरबी) आकडेवारीनुसार वर्षभरात किमान शंभर एकजण अशा ‘ऑनर किलिंग’चे बळी ठरत आहेत. आदिम अवस्थेतील मानवाकडूनदेखील अशाप्रकारचे अमानवीय कृत्य घडल्याचे दाखले मानववंशशास्त्रात मिळत नाहीत. मिळतील तरी कसे? सभ्य समाजाने आखलेल्या जातीय, धार्मिक चौकटी तेव्हा होत्याच कुठे! आधुनिक म्हणविणाऱ्या समाजाने अशा बेगडी अहंगंडाने आजवर पोटच्याच जीवांचे किती बळी घेतले, याची गणतीच नाही. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या, मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या अशा घटना ज्या समाजात वारंवार घडतात, तो समाज सभ्य कसा असू शकतो? कायद्याने अशा घटनांना अटकाव बसू शकेल, ही तर निव्वळ अफवाच! बालविवाहापासून स्त्री भ्रूणहत्येपर्यंत सामाजिक कुप्रथांना प्रतिबंध घालणारे कायदे तयार झाले म्हणून त्यास आळा थोडाच बसला? ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनांसाठी आजवर हरयाणा, राजस्थान ही राज्ये चर्चित होती. खापसारख्या जातीय पंचायतींचा त्याला हातभार असे. मात्र, महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यदेखील आता मागे राहिलेले नाही. जातीय अभिमानाचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. आंतरजातीय विवाहाचा रक्तरंजित शेवट केवळ आता ‘सैराट’ सिनेमापुरता मर्यादित राहिलेला नाही. बेगड्या सामाजिक प्रतिष्ठेने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत.

शुभांगीने तर जातीचीदेखील पायरी ओलांडली नव्हती. स्वजातीतील मुलाच्याच ती प्रेमात होती. प्रेम करणं हा गुन्हा नाही. मग त्यासाठी एवढी शिक्षा का? पोटच्या मुलीचा जीव घेताना बापाचा हात कसा थरथरला नाही? शुभांगी, तू मुलगी म्हणून जन्माला आलीस हाच तुझा दोष. ‘वंशाच्या दिव्या’साठी तुझ्यासारख्या अनेक ‘पणत्या’ आजवर या समाजाने विझवून टाकल्या आहेत. आज त्यांचीच लग्नाळू खोंडं विवाहायोग्य मुलींच्या शोधात दारोदार फिरत आहेत. शुभांगी, तुझ्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल; पण समाज म्हणून आम्ही तुझा आणि तुझ्यासारख्या अनेकींचा जीव वाचवू शकलो नाही. जमलं तर आम्हाला माफ कर!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र