शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

संपादकीय - बाेगद्यातला थरार, देशवासीयांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 6:41 AM

सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

उत्तराखंडमधील सिलक्यारा ते बडकोटदरम्यानच्या बोगद्यातून अखेर मंगळवारी पहाटे आनंदाची बातमी आली. चार धाम महामार्गावर खोदल्या जात असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे भुसभुशीत छत कोसळल्यामुळे ४१ मजूर गेले दहा दिवस अडकले आहेत. मजूर व बचावपथकांमध्ये जेमतेम पन्नास-साठ मीटरचा मलबा आहे. तो हटविण्याचे प्रयत्न फसल्यानंतर त्यातून एक सहा इंच व्यासाची पाइप आत टाकली गेली. सोमवारी रात्री त्या पाइपमधून गरम खिचडी बाटल्यांमध्ये भरून पाठविण्यात आली. गेल्या दहा दिवसांत या मजुरांना मिळालेले हे पहिले ताजे व गरमागरम जेवण होते. त्याच पाइपमधून एक इंडोस्कोपिक कॅमेरा व वॉकीटॉकी पाठवून अडकलेल्या मजुरांशी संवाद साधला गेला. त्याचे व्हिडीओ जारी करण्यात आले. सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

जून-जुलै २०१८ मध्ये गुहेत अडकलेले बारा कुमारवयीन फुटबाॅलपटू व त्यांच्या प्रशिक्षकाची सुटका करणारे थायलंडचे तज्ज्ञ, तसेच नॉर्वे व अन्य देशांतील विशेषज्ञ, अमेरिकन बनावटीची अद्ययावत यंत्रे, त्याचप्रमाणे डीआरडीओ, ओएनजीसी, नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे विकास महामंडळ तसेच सतलज व टिहरी जलविद्युत महामंडळांचे तंत्रज्ञ या मजुरांना बाहेर काढण्याचे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पर्वताला उभे-आडवे ड्रिल मारून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा बोगदा एकूण ४,५३१ मीटर लांबीचा आहे. त्यापैकी सिलक्याराच्या बाजूने २३४० मीटर तर बडकोटच्या बाजूने १६४० मीटर तो खोदला गेला आहे. पाचशे-सहाशे मीटरचे काम उरले असतानाच अपघात झाला. सुरुवातीला तो किरकोळ वाटला. मधला मलबा हटवला की मजूर बाहेर येतील असे वाटले; परंतु, हिमालयाची रचना सह्याद्रीसारखी पाषाणाची नाही. किरकोळ हादऱ्याने तिथे जमीन खचते, भूस्खलन होते. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत गेले. आतमध्ये अडकलेल्या मजुरांचा तसेच बाहेर त्यांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची मानसिक, शारीरिक अवस्था आणि बचावकार्य हा थरार एखादा चित्रपट किंवा वेब सिरीजचा मसाला आहे.

थायलंडमध्ये गुहेत अडकलेली मुले व त्यांच्या प्रशिक्षकांच्या सुटकेवर गेल्या वर्षी वेब सिरीज आलीच आहे. ती गाजलीही. हा तसाच भयपट आहे. या मजुरांनी गेले दहा दिवस मृत्यूच्या कराल दाढेत घालवले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. या अडीचशे-तीनशे तासांत त्यांनी काय विचार केला असेल, एकमेकांशी काय बोलले असतील, त्यांची दिनचर्या किती अस्वस्थ असेल. अवतीभोवती घुटमळणारा मृत्यू, जिवलगांच्या आठवणी, मलब्याच्या पलीकडच्या हालचाली, बचावासाठी होणारे प्रयत्न, त्याच्या यशापयशाची ऊनसावली, त्यामुळे होणारी घालमेल या साऱ्या अवस्था शब्दांत व्यक्त होतीलच असे नाही. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड अशा आठ वेगवेगळ्या राज्यांमधून पोटाची खळगी भरण्यासाठी जोखमीचे काम करणारे हे मजूर १२ नोव्हेंबर रोजी पहाटे बोगद्यात अडकले. ते रात्रंदिवस काम करीत होते; कारण, सरकारचा महत्त्वाकांक्षी चार धाम प्रकल्प निवडणुकीच्या आधी पूर्ण करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर क्रेन व गर्डर कोसळून झालेल्या अपघातात वीस बळी गेले. तिथेही मजूर रात्रंदिवस काम करीत होते. या अपघाताची आठवण यासाठी की, दोन्ही अपघातांशी ‘नवयुग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार कंपनीचा संबंध आहे. तेव्हा, भयकथेच्या पलीकडे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

चार धाम यात्रेतील उत्तर काशी ते यमुनोत्री प्रवासातील अवघी ४०-५० मिनिटे वाचविण्यासाठी भूसंवेदनशील हिमालयीन टापूत अशा लांब बोगद्याची गरज आहे का? साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा खोदताना आराखड्यानुसार आपत्कालीन सुटकेचा मार्ग आधी का तयार केला नाही? समृद्धी महामार्ग व चार धाम प्रकल्पातील कंत्राट एकाच कंपनीकडे हा निव्वळ योगायोग समजला तरी महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता या कंपनीकडे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे का? बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० नव्हे तर ४१ आहे, हे समजायला पाच दिवस लागले. आपण कष्टकऱ्यांच्या जगण्या-मरण्याबद्दल इतके कसे बेफिकीर असू शकतो? तसेही अनेकदा जाणवते, की या देशात गरिबांच्या जिवांना किड्यामुंग्यांइतकीही किंमत नाही. त्याच वास्तवाचे हे आणखी एक उदाहरण नव्हे काय?

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगार