- राजू नायकगोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकर यांनी आमदार अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन महिन्यांत निर्णय द्यावा अशी विनंती काँग्रेस पक्षाने केली आहे. काँग्रेस पक्षात फूट घालून त्या पक्षाच्या १० आमदारांना भाजपमध्ये जुलै २०१९ मध्ये तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना मार्चमध्ये सत्ताधारी पक्षात सामावून घेण्यात आले; परंतु त्यांनी पक्षांतरविरोधी कायद्याच्या १०व्या परिशिष्टातील तरतुदी पूर्ण न केल्याबद्दल काँग्रेस आणि मगोपने सभापतींकडे आव्हान दिले आहे. दोन्ही पक्षांनी घोषा लावल्यानंतर अखेर मगोपचे प्रमुख सुदिन ढवळीकरांच्या अर्जावर अध्यक्षांनी दोन सुनावण्या घेतल्या; परंतु त्यांची एकूण प्रवृत्ती निर्णयाला विलंब लावण्याचीच आहे.अपात्रता याचिकेसंदर्भात अध्यक्षांच्या पक्षपाती वर्तणुकीमुळे सत्ताधारी पक्षाला सतत फायदा होत आला आहे, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले जातात. पक्षांतर बंदी कायद्यात विधिमंडळ पक्षात दोन तृतीयांश फुटीचे बंधन आहे. गोव्यात दोन्ही घटना मध्यरात्रीनंतर घडल्या होत्या व त्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. सध्या प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २७ सदस्यांचा पाठिंबा आहे व दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस (पाच सदस्य) व मगोप (एक सदस्य) पुरते कोलमडले आहेत.विधानसभेचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाबाबत पक्षपाती वर्तन करण्याची शक्यता यापूर्वी अनेकदा सर्वोच्च न्यायालयानेही व्यक्त केली आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरही तो सत्ताधारी पक्षाचा सदस्य राहात असल्याने त्याच्याकडून तटस्थ निर्णयाची अपेक्षा करता येत नाही, याबाबत संसदेतही वारंवार चर्चा झाली आहे.अध्यक्षांचे हे अधिकार काढून घ्यावेत, अशीही मागणी वारंवार करण्यात आली आहे. अपात्रताविषयीच्या १०व्या कलमात जरी अत्यंत कडक अटी लागू करण्यात आलेल्या असल्या तरी देशातील पक्षांतरे थांबलेली नसून, गोव्यासारख्या छोट्या राज्यांनी तर याबाबतीत विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षाने त्याचा गैरवापर केला व आता सत्ताधारी भाजपने दुरुपयोग चालविला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर तर या कायद्यातील पळवाटांसंदर्भात खूपच गंभीर चर्चा सुरू झाली होती.
विधानसभा अध्यक्षांची पक्ष:पाती वर्तणूक कशी रोखणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 13:43 IST