मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

By यदू जोशी | Published: May 31, 2024 08:50 AM2024-05-31T08:50:28+5:302024-05-31T08:51:14+5:30

काँग्रेस वाढली तर भाजपची अडचण होईल, ठाकरे वाढले तर शिंदे हैराण! शरद पवार भारी ठरले तर अजित पवारांची डोकेदुखीही बरीच वाढेल.

Lok Sabha Election 2024 | Special Article: What will happen to after the poll results? | मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

लोकसभेचा निकाल मंगळवारी दुपारपर्यंत समजलेला असेल. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दावे - प्रतिदाव्यांचे उत्तर मतदारराजा देईल. मतदारांच्या आरशात विजेत्याचा चेहरा दिसेल. काहींवर चेहरे लपविण्याची पाळी येईल. क्यू के आइना झुठ नही बोलता... 

धास्ती सगळ्यांनाच आहे. सर्वांत जास्त ती भाजपला आहे. गेल्यावेळी एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडे गमावण्यासारखे काही नाही. गेल्यावेळी अंगावर फक्त एक कपडा राहिला होता. यावेळी सूटबूट तर नाही पण काँग्रेसला निदान पँट - शर्ट तरी मिळू शकतो. महाविकास आघाडीत सर्वांत मोठी परीक्षा  उद्धव ठाकरेंची आहे. गेल्यावेळी एका मित्राच्या मदतीने ४१ जागा पटकावणाऱ्या भाजपसमोर दोन नव्या मित्रांच्या मदतीने ४१चा आकडा टिकविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी समोर दोन शत्रू होते, यावेळी तीन आहेत. 

पहिल्या टप्प्यातल्या चुका नंतरच्या टप्प्यात दुरुस्त करता याव्यात म्हणून पाच टप्प्यांत निवडणूक ठेवली की काय माहिती नाही. आम्ही चुकांमधून शिकलाे आणि हातून जात असलेल्या जागा सावरून घेतल्या, असे भाजपचे बडे नेते आता सांगत आहेत. ‘लागो ना दृष्ट माझी माझ्याच वैभवाला’, असे कधी कधी होऊन जाते.

‘अब की बार चार सो पार’चा नारा भाजपने दिला. पण, चारशेपार जाऊन हे लोक संविधान बदलतील, या आरोपाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले. भाजप समान नागरी कायदा आणणार असे म्हणत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, ते झाले की नाही माहिती नाही. पण, मुस्लीम मतदार भाजपच्या विरोधात प्रचंड एकवटला. भाजपने हा कायदा आणला तर आदिवासींच्या विशेष हक्कांवर गदा येईल, असे विरोधकांनी पसरविले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आदिवासी व्होटबँक आपल्याकडे वळविण्यात यश आलेल्या भाजपची चिंता वाढली. दिल्लीच्या आदेशावरून दिलेल्या काही घिस्यापिट्या उमेदवारांबाबत खाली प्रचंड नाराजी होती. राष्ट्रीय मुद्द्यांवर स्थानिक मुद्दे भारी ठरू लागले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या १५ दिवसात असे एकेक मुद्दे भाजपच्या विरोधात जात असल्याचे ध्यानात आले. या मुद्द्यांनी भाजपला पराभवाच्या छायेत नेले नसेल. पण, गेल्या वेळची मोठी लीड कापली आणि महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकाच पातळीवर आणून ठेवले. एकावेळी एक नाही तर चार-पाच मांजरे आडवी जाताहेत हे लक्षात आल्यानंतर डॅमेज कंट्रोल सुरू झाले. शेवटच्या पाच-सहा दिवसात भाजपने वेगवेगळ्या पद्धतीने चक्रे फिरवली आणि बरोबरीत आलेला डाव जिंकण्यासाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली गेली. ती जिथे फळाला आली तिथे भाजप - महायुती जिंकेल, नाही फळाला आली तिथे हरेल.

भाजपसाठी गडचिरोली, चंद्रपूर, दिंडोरी, सोलापूर, भिवंडी या जागा मोठ्या डेंजर झोनमध्ये असल्याचे भाजपचे नेते कबूल करतात. मतदानाच्या दोन दिवस आधी असलेल्या रामनवमीने चंद्रपूरमध्ये, तर मतदानाच्या तीन दिवस आधी असलेल्या हनुमान जयंतीने आम्हाला अमरावतीत तारले, असेही ते सांगत आहेत. विदर्भात आम्ही भाजपला सर्वांत मोठे धक्के देऊ, असे काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत.  शिंदेंसाठी दक्षिण मुंबई, यवतमाळ -वाशिम, कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली, नाशिक, शिर्डी, उत्तर - पश्चिम मुंबई खूप अडचणीच्या आहेत, असे त्यांचे काही लोक सांगतात. मात्र, यवतमाळ - वाशिम, कोल्हापुरात आम्ही चमत्कार करू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

आमची बारामती, रायगड पक्के आहे, उस्मानाबाद, शिरूरमध्ये काही खरे नाही, असे अजित पवार समर्थक खासगीत सांगतात. महायुतीचे मोठमोठे नेतेही ३०-३२पेक्षा अधिकचे दावे करताना दिसत नाहीत. त्यातले काहीच जण म्हणतात की, आम्ही ३५ पर्यंत जाऊ. महाविकास आघाडीचे नेते फिप्टी - फिप्टी होईल, असा तर्क देत आहेत.

निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण नक्कीच ढवळून निघेल. महायुती २८-३० च्या आत निपटली, तर तीन मित्रांमध्ये रुसवे - फुगवे, आरोप - प्रत्यारोप सुरू होतील. एवढ्याच जागा आल्या तर त्याचा थेट परिणाम पाच महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीवर नक्कीच होईल. महाविकास आघाडीचे मनोबल फारच वाढलेले असेल. काँग्रेस वाढली तर भाजपची अडचण होईल, ठाकरे वाढले तर शिंदे हैराण होतील, शरद पवार भारी ठरले तर अजित पवारांची डोकेदुखी बरीच वाढेल. महायुतीत भाजपला चांगले यश मिळाले, शिंदे अन् अजित पवारांचे जेमतेमच खासदार जिंकले तर मोठ्या भावाचा लहान भावांना त्रास वाढेल. भाजपच्या जागा कमी आल्या तर अंतर्गत धुसफूस वाढेल. दिल्लीशी जवळीक असलेले एक-दोन नेते विरूद्ध राज्यातील काही नेते असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे, तो प्रकट स्वरुपात दिसू शकेल. महाविकास आघाडीतही धुसफूस पाहायला मिळेल.

लोकसभेला महायुतीच्या गाडीत तीन आणि महाविकास आघाडीच्या गाडीत तीन पक्ष मुश्किलीने बसले. विधानसभा निवडणुकीत ते बसतीलच याची काही गॅरंटी नाही. लोकसभेच्या निकालावर ते अवलंबून असेल. मराठा मतांचा फटका बसून महायुतीचे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात नुकसान झाले तर आपण एकीकडे व आपला समाज दुसरीकडे आहे आणि त्याचा फटका आपल्याला विधानसभेत बसेल, हे लक्षात घेऊन बाहेरून महायुतीच्या पक्षांमध्ये आधी गेलेले काही नेते महायुतीचे बोट सोडून दुसरीकडे उड्या घेतील.

लोकसभेला कोणी रंग उधळेल, कोणाचे रंग उडतील पण विधानसभेच्या पूर्वी, इकडे काय आणि तिकडे काय; एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ दिसतो.

यदु जोशी (yadu.joshi@lokmat.com)

Web Title: Lok Sabha Election 2024 | Special Article: What will happen to after the poll results?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.