शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हे ‘लाड’ कसे परवडतील? महायुतीची अस्तित्वासाठीची धडपड अन् घोषणांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2024 07:10 IST

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत आणखी पाच-पन्नास घोषणा केल्या जातील. 

अस्तित्वाचा प्रश्न समोर उभा असलेला माणूस कुठल्याही थराला जातो. ती अस्तित्वासाठीची धडपड असते. व्यक्ती आणि सरकार यामध्ये फारसा फरक नाही हेच गेल्या काही दिवसांत राज्यातील महायुती सरकारकडून सुरू असलेल्या बेसुमार घोषणांतून दिसते. ४४ लाख शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना मोफत वीज, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडका भाऊ, गरजू महिलांकरिता गुलाबी ई-रिक्षा, वारकऱ्यांसाठी महामंडळ अशा एक ना अनेक योजनांची दररोज घोषणा केली जात आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत आणखी पाच-पन्नास घोषणा केल्या जातील. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता आतापर्यंत एक कोटी १३ लाख ९१ हजार महिलांनी अर्ज भरले असून या योजनेकरिता ४६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ४४ लाख शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना मोफत वीज द्यायची तर १४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अन्य घोषणांमुळे पडणारा बोजा हा असाच काही हजार कोटी रुपयांचा असेल. थोडक्यात राज्यातील विद्यमान सरकार विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत पुढील सरकारवर किमान एक लाख कोटी रुपयांचा बोजा वाढवून ठेवणार आहे. राज्यातील सध्याचे सत्ताधीश त्यांच्या पूर्वसुरींनी मळवलेल्या वाटेनेच वाटचाल करीत आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा युती सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करु, अशी घोषणा केली होती. 

तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या घोषणेने धास्तावले. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यांकरिता वीज बिल माफी केल्याने पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले; मात्र शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची माळ विलासराव देशमुख यांच्या गळ्यात पडली. युतीवर मात करण्याकरिता शिंदे यांनी केलेल्या घोषणेचे  विपरीत आर्थिक परिणाम होणार आहेत हे लक्षात आल्यावर देशमुख यांनी ही वीजमाफी रद्द केली. इतकेच नव्हे तर निवडणुकीपूर्वी दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण करायची नसतात, अशा शब्दांत आपल्या कृतीचे समर्थन केले. 

२० वर्षांपूर्वीच्या या इतिहासाची आठवण करून देण्याचा हेतू हाच आहे की, निवडणुकीपूर्वी खैरात वाटणारे पुन्हा त्याच पदावर येतात असे नाही. किंबहुना शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री झाले असते तरी त्यांनाही मोफत विजेचा निर्णय दीर्घकाळ अमलात आणणे शक्य झाले नसते; मात्र देशमुख यांना शिंदे यांनी दिलेला शब्द ज्या सहजतेने फिरवणे शक्य झाले तसे ते शिंदे यांना शक्य झाले नसते. केंद्र सरकार देखील कोरोना काळापासून ८० कोटी गोरगरीब भारतीयांना पाच किलो धान्याचे वाटप करीत आहे. सामान्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक लाभ जमा करण्याच्या अनेक योजना केंद्र सरकारनेही गेली दहा वर्षे अमलात आणल्या. त्या बळावरच आपण चारशेपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास केंद्र सरकारला वाटत होता; मात्र तसे झाले नाही. 

लोकसभा निकालाचा अभ्यास करताना मग असे लक्षात आले की, लोकांच्या खात्यात दरमहा दोन-पाच हजार रुपये जमा होत होते. पण दहा वर्षांत महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की, दहा वर्षांपूर्वी ज्या रकमेत त्या गोरगरिबांचे भागत असे तसे ते आता भागत नव्हते. सध्या महाराष्ट्राच्या डोक्यावर आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा भार आहे. १९९९ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारने सत्तेची सूत्रे खाली ठेवली तेव्हा जेमतेम दहा हजार कोटी रुपयांचे राज्यावर असलेले कर्ज ४० हजार कोटी रुपयांवर नेल्यामुळे दोन्ही काँग्रेसनी टीका केली होती. आर्थिक बोजा वाढवणाऱ्या सध्याच्या घोषणाबाजीला राज्याच्या अर्थ खात्याने केलेला विरोध हा रास्त आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्यांची एक अंकी जागांवर घसरगुंडी झाल्याने व महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्याने आता सत्ताधाऱ्यांना भाऊ, बहिणीसह अनेक नातेसंबंधांची आठवण झाली आहे. सध्या या घोषणांची समाजमाध्यमांवर उडवली जाणारी रेवडी पाहिली तरी ही रेवडी संस्कृती जनतेला फारशी रुचलेली नाही, हेच दिसते. त्यामुळे अशा आर्थिक विवेकशून्य घोषणा करण्यामागे पुढे सत्तेवर येणाऱ्या पक्षांची व व्यक्तींची गोची करून ठेवणे याखेरीज दुसरा हेतू दिसत नाही. युती-आघाडीच्या अशा लोकानुनयी घोषणाबाजीची जबर किंमत महाराष्ट्रातील जनता गेली ३० वर्षे चुकवत आहेच.

 

टॅग्स :PoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी