शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

ना स्वर्ग, ना नरक; पाकिस्तान आहे ‘स्किझोफ्रेनिक’

By admin | Published: September 02, 2016 2:57 AM

‘पाकिस्तान नरक नाही’, केवळ इतकेच म्हटल्यावरुन अभिनयक्षेत्रातून राजकारणात आलेल्या रम्या या अभिनेत्रीवर राष्ट्रद्रोहाच्या खटल्यास सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

- राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)‘पाकिस्तान नरक नाही’, केवळ इतकेच म्हटल्यावरुन अभिनयक्षेत्रातून राजकारणात आलेल्या रम्या या अभिनेत्रीवर राष्ट्रद्रोहाच्या खटल्यास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. खरे तर भारतीय पत्रकारांच्या दृष्टीने परदेशात राहून वार्तांकन करण्यासाठी पाकिस्तानइतका चांगला देश दुसरा कुठलाही नाही.१९९५ ते २००४ दरम्यान मी अनेकदा त्या देशात जाऊन आलो. प्रत्येक वेळी तिथे मला नवीन काही तरी बघायला आणि करायला मिळाले. १९९६ साली पहिल्यांदाच आमच्या पत्रकार चमूने दाऊद इब्राहीमचे कराचीतील घर शोधून काढले होते. आम्ही एमक्यूएमच्या दहशतवाद्यांनी कराची शहरात केलेल्या उच्छादाचे विशेष वार्तांकन केले होते. लष्करच्या दहशतवादी शिबिरांचे वार्तांकन तर केलेच पण आम्ही जमात-उद-दवाचे मुख्यालयदेखील शोधून काढले होते. पेशावरमधील शस्त्रांच्या बाजारातून आम्ही फिरून आलो आणि ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान हद्दीवरील ठिकाणापर्यंतही जवळजवळ जाऊन पोहोचलो. पण आमच्या व्हिसाप्रमाणे आम्हाला लाहोर आणि इस्लामाबादच्या पलीकडे जाण्याची परवानगी नसल्याने आमच्या तेथील सूत्राने अखेरच्या क्षणी आम्हाला थांबवले होते. आम्ही पाकिस्तानी समाजाच्या चांगल्या बाजू दाखवल्या, कराचीतील अब्दुल सत्तार इधी यांच्या पीस फाऊंडेशनला प्रसिद्धी दिली आणि पाकिस्तानी टीव्हीवर एक मालिका सुद्धा चालवली. तेथील पहिल्या महिला रॉक बँडमधील कलाकारांची मुलाखत घेतली आणि लाहोरच्या फूड स्ट्रीटवर एक फीचरही तयार केले. लालूप्रसाद यादव यांच्या पाकिस्तान दौऱ्यात आम्ही त्यांच्या सोबत होतो. इस्लामाबादेतील बाजारात त्या बिहारी नेत्याला बघून सगळेच दंग झाले होते. लालूंनी आपल्या मिश्कील शैलीत तिथला एक बटाटा हातात उंचावून ‘पाकिस्तानने आलू, बिहारमे लालू’ अशी कोटी केली व तिला तिथल्या गर्दीने चांगला प्रतिसादही दिला. तरीदेखील भारतातील चित्रवाणीचे पत्रकार म्हटल्यावर आमच्याकडे बघणाऱ्या नजरांमध्ये संशय दाटत होता. त्यातूनच वार्तांकन करणे एकीकडे अवघड तर दुसरीकडे मजेशीर झाले होते. आम्ही जिथे जाऊ तिथे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेची वाहने आमच्या पाठलाग करीत असत. परतीच्या मार्गावर असताना आम्ही ‘मॅकडोनाल्ड’मध्ये थांबलो असता आठवडाभर आमचा पाठलाग करणाऱ्या लोकाना आम्ही बर्गर आणि फ्रेंच फ्राईज देऊ केल्या पण त्यांनी बर्गर नाकारुन केवळ फ्रेंच फ्राईजचा स्वीकार केला. प्रत्येक भेटीच्या वेळी राजकीय वातावरण भले कसेही असले तरी तेथील आदरातिथ्य आणि स्वागत यात फरक जाणवला नाही. वाजपेयींच्या लाहोर बस यात्रेच्या वेळीदेखील ते तसूभरही कमी झालेले नव्हते. इतक्या कमी वेळात भारतीयांना इतके कबाब खायला मिळावेत हे त्याआधी कधीच घडले नव्हते. कारगील युद्धादरम्यान मला पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलाखत हवी होती. मी त्यांना त्यांच्या क्रिकेटच्या सरावाच्या वेळी भेटायला गेलो, कारण मला तीच वेळ योग्य वाटत होती. या भेटीच्या वेळी ‘तुम्ही त्यांना आऊट मात्र करु नका’, असा प्रेमळ सल्ला मात्र त्यांचे माध्यम सल्लागार मुशाहीद हुसेन यांनी मला दिला होता. शरीफ यांचा सराव आटोपल्यानंतर त्यांनी आम्हाला मुलाखत तर दिलीच पण पंतप्रधान निवासात शानदार मेजवानीही दिली. शरीफ यांचे क्रिकेट आणि खाद्यपदार्थ यांच्यावर चांगलेच प्रेम असल्याचे आम्हाला तेव्हां जाणवले. खरे तर आम्हाला सीमेवरील युद्धावर बोलायचे होते पण शरीफ मात्र तो मुद्दा टाळत पाकिस्तानातील गाजराचा हलवा व त्यांनी जुन्या दिल्लीत चाखलेला गाजराचा हलवा यांची तुलना करीत बसले.भारत-पाक यांची तुलना हा तेथील कुटुंबांमधला भोजनप्रसंगीच्या चर्चेचा आवडता विषय असतो. पाकिस्तानी लोक भारताविषयी आजही खूप झपाटलेले आहेत. त्यांच्या चर्चेत मग कधी इम्रान खान-कपिल देव तर कधी नूरजहाँ-लता मंगेशकर यांच्यात तुलना केली जाते आणि स्वत:च्या श्रेष्ठत्वाचा आव आणला जातो. काश्मीरचा प्रश्न आणि तेथील पाक पुरस्कृत दहशतवादी कारवाया यापायी शत्रुत्वाच्या भावनेत भर पडली आहे. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाला बळी पडण्याआधी दहशतवादी आणि स्वातंत्र्ययोद्धे यांच्यात फरकच करायला तयार नव्हता. दोन वर्षांपूर्वी कराचीत मी गेलो तेव्हां पहिल्यांदाच मला पाकिस्तानी वक्त्यांचा रोख बदललेला दिसला. भारताने आपल्याला कधीच खूप मागे टाकले आहे व दरम्यान आपण दहशतवादाचा भस्मासुर निर्माण करून ठेवला आहे व तो आपल्यालाच तापदायक ठरत आहे, अशी आता पाकी लोकाना जाणीव झाली असली तरी काश्मीरातील फुटीरांना असलेली त्यांची सहानुभूती कमी होताना मात्र दिसत नाही. जे लोक थोडे प्रागतिक विचाराचे आहेत तेदेखील काश्मीरातील संघर्षाचे समर्थन करतानाच दिसतात. वर्षानुवर्षांची लष्करी राजवट, कट्टर इस्लामवाद आणि भारताशी असलेले शत्रुत्व यावरच ज्या देशाचे अस्तित्व टिकून आहे, त्या पाकिस्तानात आपल्या शेजाऱ्याशी मित्रत्वाने वागण्याची क्षमता नगण्यच आहे. हे सारे विचारात घेता, पाकिस्तानशी फार प्रेमाने जसे वागायची गरज नाही त्याचप्रमाणे त्याला सतत दुष्ट मानत राहाण्याचेही कारण नाही. तसे करण्याऐवजी पाकिस्तानशी व्यापारी संबंध निर्माण करण्याची गरज आहे. पाकिस्तान ना स्वर्ग आहे ना नरक. भारताच्या संदर्भात पाकिस्तान स्किझोफ्रेनिक म्हणजे दुभंगलेल्या मानसिक स्थितीत आहे. हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीन तुम्हाला भारतीय हेर समजून एखाद्या खोलीत कोंडू शकतो तर एखाद्या हॉटेलात तिथला पियानो वादक तुमच्या सन्मानार्थ ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणेही वाजवू शकतो. त्यामुळे प्रेम आणि द्वेष यात अडकलेल्या पाकिस्तानला अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे हीच गरज आहे. ताजा कलम: २००४ साली मी लाहोरला एक-दिवसीय क्रिकेट सामना पाहाण्यासाठी माझ्या नऊ वर्षाच्या मुलासोबत गेलो होतो. पाकिस्तानी प्रेक्षक भारतीय द्रुतगती गोलंदाज बालाजीला प्रोत्साहित करताना ‘बालाजी जरा धीरे चलो’ असे म्हणत होते. सामन्यात भारत जिंकला, तेव्हा उद्विग्न झालेल्या एका पाकिस्तानी प्रेक्षकाने माझ्या मुलाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिला. मुलाने तो भेट म्हणून स्वीकारला व आपल्या खोलीतल्या भिंतीवर लावून ठेवला. त्याच्या या कृतीकडे तेव्हां सद्भावना म्हणून पाहिले गेले. आज मात्र तो राष्ट्रद्रोह समजला जाईल.