- डॉ. रवी अभ्यंकर
आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणायची असल्यास त्यासाठी करोडोंनी पैसा, जास्त मनुष्यबळ खर्ची पाडून क्रांती होईल, ही अपेक्षा बाळगणे योग्य नाही. ‘तुज आहे तुजपाशी’ अशी स्थिती सध्या आहे. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे, पण त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करण्याची गरज आहे. प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. पण अजूनही तो ग्रामीण भागातील व्यक्तींना, गरीब व्यक्तींना मिळत नाही. सर्दी, ताप, खोकल्यासारख्या साध्या आजारापासून ते मलेरिया, टीबीसारख्या आजारांसाठी उपचार उपलब्ध नाहीत. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रगतीची उंच शिखरे गाठली आहेत. हायटेक ट्रीटमेंटच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवर उपचार केले जात आहेत. सध्या भारतात मेंदूत इलेक्ट्रोड बसवणे, स्टेम सेल थेरपीचा वापर करणे अशा अत्याधुनिक उपचार पद्धती वापरल्या जात आहेत. पण या उपचारांसाठी येणारा खर्च सामान्यांना परवडण्यासारखा नाही. अत्याधुनिक उपचारपद्धती रास्त दरात सर्वांना उपलब्ध व्हावी, तळागाळातील लोकांपर्यंत ही उपचारपद्धती पोचावी, यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्युबासारख्या छोट्या देशात सर्वांना मोफत उपचार दिले जातात. आपल्याकडे अशी पद्धती राबवता येईल की नाही, हे सांगता येत नाही. पण त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या उपचारांसाठी पैसे जास्त खर्च होतात. हे टाळण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. आजारी पडणेच आपल्याला टाळता आले पाहिजे. औषधोपचार रास्त दरात सर्वांना उपलब्ध झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होईल. कारण यामुळे सर्वांना अत्याधुनिक औषधोपचार मिळतील. त्यांचा हक्क त्यांना मिळेल.
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)